नांदेड दि. १८
ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'आभाळमाया' ह्या बालकवितासंग्रहाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हे पुस्तक पुण्यातील चेतक बुक्स ह्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे.
डॉ. सावंत यांची आजवर ५६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी ३३ पुस्तके बालसाहित्याची आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तीन पुरस्कारांसह अन्य प्रतिष्ठित साहित्यसंस्थांचे ४५ पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. पुणे येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. सावंत यांचे साहित्य शालेय तसेच विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट झाले आहे. त्यांच्या एकूण बालकवितेवर संशोधन करून एका विद्यार्थ्याने एम. फिल. ही पदवी संपादन केली आहे. अनेक विद्यापीठांत त्यांच्या बालसाहित्यावर संशोधन होत आहे.
डॉ. सुरेश सावंत यांची १) वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती, २) बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध, ३) आजची मराठी बालकविता, आणि ४) बालसाहित्यातील नवे काही ही पुस्तके संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहेत. डॉ. सावंत यांनी कुंटूर, जळगाव आणि पैठण येथे संपन्न झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. सावंत यांनी १२१ पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत किंवा पाठराखण केली आहे. अलीकडेच शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेले आणि संतोष तळेगावे यांनी संपादित केलेले 'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा