सेलू : महाकवी कालिदासानंतर चिखलीच्या मेळाव्यात शरद जोशींनी 'शेतकर्यांचा महाकवी' ही उपाधी कवी इंद्रजित भालेराव यांना दिली. देवाच्या पायावर पडलेलं फूल ते आहेत. शेतकरी व कवीचा सन्मान हा 'सर्जकोत्सव' जगात तोलामोलाचा आहे, असे प्रतिपादन किसानपुत्र आंदोलन, महाराष्ट्र राज्याचे प्रणेते अमर हबीब यांनी केले.
सेलू येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने बुधवार (ता. १९) रोजी तालुक्यातील आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक विद्यालयात अक्षर व्याख्यानमालेत 'आता उठवू सारे रान' या विषयावर कवी इंद्रजित भालेराव यांच्या षष्ठयब्दीपूर्ती सोहळ्यात त्यांनी भाष्य केले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, कृषिभूषण कांतराव देशमुख, शेतकरी संघटनेचे माणिक कदम, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, पत्रकार माणिक रासवे आदी उपस्थित होते.
यावेळी हबीब म्हणाले, शेतकरी सर्जक विरुध्द बांडगूळ हा खरा संघर्ष आहे. शेतक-यांच्या बाबतीतले सिलिंग कायदा, घटना दुरुस्ती व निर्बंध दूर केल्यावर शेतकरी स्वतंंत्र होईल. शेतकरी 'आत्महत्या' नाहीत त्या 'सरकारबळी' आहेत. शेतकर्यांची पिढी शेतातून बाहेर पडून विविध क्षेत्रात पुढे आलेली आहे, अशा शेतकरी पुत्रांनी पुढाकार घेऊन किसानपुत्र आंदोलनात सहभागी व्हावे, शेतकर्यांना स्वातंत्र्य देणारे राज्य यावे याकरिता 'रान उठवावे' लागेल, यावर त्यांनी जोर दिला. प्रारंभी सर्जेराव लहाने यांनी प्रास्ताविक केले.
षष्ठयब्दी निमित्त प्रयोगशील ६० शेतकरी व शेतकरी महिलांचा कवी इंद्रजित भालेराव यांचे पुस्तके, सन्मानपत्र व फेटा प्रदान करुन सन्मान करण्यात आला. हा प्रसंग उपस्थितांना भावला. या 'सर्जकोत्सवाला' टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.
शेतकर्यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्रांचे शब्दांकन शरद ठाकर यांनी केले, तर वाचन रामराव गायकवाड यांनी केले. इंद्रजित भालेराव यांना महावस्त्र व सन्मानपत्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सन्मानाला उत्तर देताना कवी भालेराव म्हणाले, रूमणं हा पृथ्वीचा आस आहे. या रूमण्याच्या जोरावर कुणब्याने स्वत:च्या हिंमतीवर जगाला पोसलेले आहे. याच कुणब्याची मी कविता लिहिली. 'शेतकरी' हाच माझा पक्ष आहे. 'कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक' ही कविता शेतकरी संघटनेने रौप्य महोत्सवात अमर हबीब यांच्यामुळेच स्वीकारली. महात्मा फुले यांच्यानंतर मी कवितेत शेतकरी हा 'निर्मिक' शब्द वापरून शेती व शेतकर्यांच्या तत्वज्ञानावर आधारित पहिल्या पासूनच कविता लिहिली. माझ्याबरोबर ६० शेतकर्यांचा सन्मान ही अभूतपूर्व घटना आहे.
अध्यक्ष समारोप करताना डॉ. कोठेकर म्हणाले, शेतीत नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी, शेतकरी कवीच्यासोबत सन्मानित करताना आपण कृतज्ञ झालो. काम आणि शब्द यानिमित्ताने अनुभवता आले.
मान्यवरांचा परिचय डॉ. काशीनाथ पल्लेवाड यांनी करून दिला, मानपत्राचे वाचन डॉ. अशोक पाठक यांनी केले. रामराव बोबडे, डॉ. सतीश मगर, यांनी स्वागत केले. माधव गव्हाणे, ज्ञानेश्वर सोळंके यांनी सन्मानित शेतकरी यादी वाचन केले. रमेश नखाते, एकनाथ जाधव व नितीन माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार सुभाष मोहकरे यांनी मानले.


COMMENTS