नांदेड:(दि.१३ मार्च २०२६)
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण केली. महाराष्ट्राच्या आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्राचा पाया रचला. ते केवळ राजकारणी नव्हते; तर चांगले साहित्यिक होते. एकविसाव्या शतकातील तरुणांपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे कार्य पोहोचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे 'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाण' या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.साईनाथ बिंदगे यांची उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते डॉ.अजय गव्हाणे यांनी, यशवंतराव चव्हाण यांचे संयुक्त महाराष्ट्रातील योगदान, संवेदनशील राजकारणी म्हणून पार पाडलेली भूमिका आणि बेरजेचे राजकारण या तत्त्वाचा केलेला स्वीकार तसेच आधुनिक, विज्ञाननिष्ठ आणि समताधिष्ठित महाराष्ट्र घडविण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या अपार कष्टाचा आढावा घेतला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, यशवंतराव चव्हाण यांची भूमिका आणि मराठी माणसाचे सद्य आर्थिक, राजकीय व सामाजिक स्थितीचे वर्णन आपल्या सविस्तर व्याख्यानात केले व आजच्या विद्यार्थ्यांनी सकारात्मक, सहकार्यात्मक व आशावादी दृष्टिकोन ठेवून गुणवत्तापूर्ण कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वीरभद्र स्वामी यांनी केले; शेवटी आभार डॉ. साईनाथ बिंदगे यांनी मानले. व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, प्रबंधक संदीप पाटील, जगन्नाथ महामुने, प्रेमराज ढवळे, अभिजीत तारू, ज्ञानेश्वर डाके यांनी सहकार्य केले. व्याख्यानास विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS