सानपाडा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती जल्लोषात साजरी

   नवी मुंबई : शिवसेना सानपाडा विभाग व राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, सानपाडा नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती  ८ जून २०२५ रोजी सानपाडा येथील केमिस्ट भवन  येथे मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते  विजय नाहटा होते. यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते सागर मदने यांचे "पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जीवनचरित्र" या विषयावर व्याख्यान झाले. अहिल्यामातेच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने धनगर समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय अहिल्या पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले. यावेळी अशोक दाजी जंगले(सिंधुदुर्ग - कोकण विभाग) यांना "अहिल्या समाजभूषण पुरस्कार", ठाणे विभागाच्या उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कु. ज्योती हिंदुराव कांबळे-पाटील यांना "अहिल्या शिक्षणरत्न पुरस्कार", नवी मुंबई पोलीस निरीक्षक  सुभाष शंकर पुजारी (कोल्हापूर) यांना "अहिल्या क्रीडारत्न पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.  पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मान चिन्ह (ट्रॉफी), सन्मानपत्र, काठी आणि घोंगडी देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मान पत्राचे वाचन संस्थेचे सचिव श्री शशिकांत गोरड यांनी केले.  कार्यक्रमाला प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती.

    कार्यक्रमाआधी शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख  मिलिंद सूर्यराव यांच्या नेतृत्वामध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत सानपाडा नगरीतून अहिल्यादेवींच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. उपस्थितांना संबोधित करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  विजय नाहटा म्हणाले की,  अहिल्यादेवी होळकर या उत्तम राज्यकर्त्या आणि प्रशासक होत्या. त्यांच्या कार्याची नोंद संपूर्ण जगाने घेतली आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवींची ३०० वी जयंती संपूर्ण भारत देशाने साजरी केली. संपूर्ण भारत देशातील प्रमुख मंदिरांचा जिर्णोद्धार करणाऱ्या अहिल्यादेवींच्या नांवे सानपाडा मध्ये भव्य असं अहिल्या भवन बांधलं जातंय ही भाग्याची गोष्ट आहे. आज संस्थेला मदतीसाठी आर्थिक निधीची गरज आहे. तेव्हा समाज बांधवांनीही भवन उभारणीसाठी आपल्याला जमेल तशी आर्थिक मदत करावी,असे आवाहनही  विजय नाहटा यांनी केले.

  याप्रसंगी  डॉ. अरुण गावडे, उपजिल्हाधिकारी कु. ज्योती कांबळे- पाटील, कोकणरत्न अशोक जंगले सर, पोलीस निरीक्षक  सुभाष पुजारी, उपजिल्हाप्रमुख  मिलिंद सूर्यराव यांची मार्गदर्शनपर  भाषणे झाली. व्यासपीठावर  संजय खताळ, डॉ. केशव काळे,  व्याख्याते सागर मदने, नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, मा.नगरसेवक काशिनाथ पवार, समाजसेवक संजय पाथरे, पांडुरंग गावडे, संजय भोसले, अरुण गुरव, प्रविण नारकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विनय मोरे यांनी केले तर आभार  प्रतिष्ठानचे सचिव  शशिकांत गोरड  यांनी मानले.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या