लातूर दि.02/01/2023
“ग्रंथालय शाळेच्या दारी” या उपक्रमातून सक्षम भावी पिढी घडविण्यासाठी ग्रंथालय आणि शाळा यांचा समन्वय असणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगामध्ये शालेय विद्यार्थी वाचनापासून काही प्रमाणात दूर होत आहेत. त्यामुळे शाळा आणि ग्रंथालयाच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणावे, वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ग्रंथालयाच्या माध्यमातून “ग्रंथालय शाळेच्या दारी” हा उपक्रम मोफत राबविण्याची मोहिम शिक्षण व ग्रंथालय विभागाच्या पुढाकाराने सुरू झालेली आहे. या उपक्रमाची सुरुवात कव्हा येथील स्वामी दयानंद विद्यालय व जिल्हा परिषद शाळेपासून करण्यात आली असून या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास “ग्रंथालय शाळेच्या दारी” या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वाचनाची गोडी वाढेल असे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी केले.
यावेळी ते लातूर तालुक्यातील कव्हा येथे श्री.शिवाजी सार्वजनिक वाचनालय, स्वामी दयानंद विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथालय शाळेच्या दारी या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालय रेणापूरचे प्राचार्य डॉ.आर.एस.अवस्थी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.दत्तात्रय मठपती, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल गजभारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाने, माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्रा.विजय मिरकले, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष हावगिराव बेरकिळे, सचिव राम मेकले, ग्रंथमित्र संजय सूर्यवंशी, मुख्याध्यापक आप्पासाहेब पाटील, प्राचार्य गोविंद शिंदे, मुख्याध्यापक अरूणा कांदे, मु.अ.जग्गनाथ गौंडगावे, मु.अ.व्ही.एम.अंबूलगे, “ग्रंथालय शाळेच्या दारी” या उपक्रमाचे मुख्य संयोजक प्रा.मारूती सूर्यवंशी, ग्रंथपाल लक्ष्मण सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना प्राचार्य डॉ.आर.एस.अवस्थी म्हणाले, ग्रंथालय व शाळा यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा स्तूत्य उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामुळे आदर्श पिढी निर्माण होण्यासाठी मोठी मदत होईल. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक भागेल असे उपक्रम समाजासाठी विधायक असल्यामुळे शिक्षण विभागाने जिल्हाभरात राबवावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
जिल्हा शिक्षणाधिकारी नागेश मापारी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणाले की, “ग्रंथालय शाळेच्या दारी” हा उपक्रम ग्रंथालय व शाळा यांच्या समन्वयातून राबविण्यात येत आहे, या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रभावी प्रयत्न केला जात आहे. याच्या अंमलबजावणीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मारूती सूर्यवंशी यांनी केले. प्रारंभी “ग्रंथालय शाळेच्या दारी” या उपक्रमाअंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात दोन शाळेतील 10 विद्यार्थ्यांची वाचनालयासाठी मोफत सभासद नोंदणी करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्रा) वंदना फुटाणे,उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, ग्रंथालय संघ अध्यक्ष हावगिराव बेरकिळे, मु.अ.गोविंद शिंदे यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दूल गालीब शेख यांनी मानले.
वाचन संस्कृतीची चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे
- सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.दत्तात्रय मठपती
स्पर्धेच्या युगामध्ये ज्ञानासारखी पवित्र गोष्ट दुसरी कोणतीही नाही. ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून ज्या अनेक क्रांत्या घडल्या त्यामध्ये वैचारिक, पुस्तक व लेखनाच्या बळावर झालेल्या अनेक क्रांत्यांची नोंद आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे. वाचन ही एक कला आहे, वाचन करून कला शिकवली पाहिजे, खर्या अर्थाने, वाचन करून हावभाव निर्माण झाले. वाचनाने खदाखदा हसवले, ढसाढसा रडवले, विचार करायला भाग पाडल, परंतु आशयाशी समरस होऊन जे वाचन केले ते खरे वाचन आहे. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रंथालय व शाळांनी वाचन संस्कृतीची चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.दत्तात्रय मठपती यांनी केले.

COMMENTS