जागतिक कोरोना महामारीच्या संकटात अत्यावश्यक सेवेत काम करणारे गोदी कामगार, हॉस्पिटल कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करीत आहेत, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन ही जुनी युनियन असून कामगार हितासाठी सकारात्मक काम करीत आहे, याचा मला अनुभव आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, त्याची आपणांस तयारी करावी लागेल. कामगारांनी कोव्हक्सींन लस घेतली पाहिजे, त्यासाठी युनियनने प्रयत्न करावेत. असे स्पष्ट उदगार मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी ऑन लाईन वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी शुभेच्छापर भाषणात काढले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचा १०१ वा वर्धापन दिन सोहळा ३ मे २०२१ रोजी ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली माझगाव येथील कामगार सदन सभागृहातून झाला. या शुभमुहूर्तावर पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी श्री. हरभजन सिंग सिद्धू यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे देशातील कामगारांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. खूप वाईट दिवस पहायला मिळाले. आज देश भयंकर स्थितीतुन जात आहे. कामगार हा देशाचा निर्माणकरता आहे. त्यांच्या नोकरीची सुरक्षा महत्वाची आहे. बंदर व गोदी कामगार जहाजातील मालाची चढ उतार करण्याचे अतिशय महत्वाचे काम करतात. केंद्र सरकारने मालकांच्या दबावापुढे कामगार वर्ग हा महत्वाचा घटक असताना देखील कोणालाही विश्वासात न घेता ४४ कामगार कायद्यांचे रूपांतर ४ कामगार कायद्यात केले. आपण सर्वांनी एकत्रित राहून कामगारांना गुलाम बनू देत काम नये.
ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, प्रथम मी कोरोना संकटात मृत्यू पावले त्यांना वंदन करतो. आज अत्यावश्यक सेवेतील कामगार जीव धोक्यात घालून काम करीत आहेत, त्या सर्वांचे मी कौतुक करतो. कुशल नेतृत्व, निष्ठावंत कार्यकर्ते यामुळे कामगार संघटना शक्तिशाली ठरते. आज भांडवालदाराविरुद्ध लढा द्यायचा असेल तर, शेतकरी, कामगार, असंघटित कामगार या सर्व श्रमिकांना एकत्र करण्याची गरज आहे. या लढ्यात तरुण व महिलांना सहभागी केले पाहिजे. काळाप्रमाणे आपणांस बदलावे लागेल, कोरोना संकटाचे हेही दिवस जातील, पुन्हा चांगले दिवस येतील, मात्र माणुसकीचा झरा शेवटपर्यंत जिवंत ठेवला पाहिजे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त श्री. सुधाकर अपराज यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की,मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनची स्थापना ३ मे १९२० रोजी झाली. या संघटनेला एन. एम. जोशी, जमनादास मेहता, अशोक मेहता, डॉ. शांती पटेल यांसारख्या लोकप्रिय कामगार नेत्यांचे योगदान लाभले आहे. कोरोना काळात पोर्ट ट्रस्टचे कामगार व हॉस्पिटलचे कामगार अत्यावश्यक सेवेतील आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे त्यास चांगले सहकार्य मिळत आहे. पंतप्रधानांनी सांगितले आहे की, व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, त्यामुळे सार्वजनिक उद्योगांचे व प्रमुख बंदराचे खाजगीकरण करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. सरकारच्या या खाजगीकरण धोरणाला कामगारांचा विरोध आहे. सध्या पोर्ट ट्रस्ट आर्थिक संकटात असले तरी त्यामधून मार्ग काढण्याचे प्रयत्न चालू आहेत, कायद्याने झालेल्या गोदी कामगारांच्या वेतन करारानुसार कामगारांना थकबाकी मिळाली पाहिजे.
याप्रसंगी इंडट्री ऑलचे सुलतान मोहम्मद, प्रवीण रॉय, आयटीएफचे संगम त्रिपाठी, नुसीचे जनरल सेक्रेटरी अब्दुल गनी सारंग, महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी जे. आर. भोसले, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, टाकसाळ मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी मुकुंद वाजे, अलंग सोशिया शिप रिसायकलिंग अँड जनरल वर्कर्स असोसिएशनचे सेक्रेटरी संजय सिंग, आयटीयुसिचे खईम पाशा इत्यादी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सभेचे स्वागताध्यक्ष व सूत्र संचलन युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी केले तर आभार युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांनी मानले.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS