मुंबई दि.२६ : जे कामगार कायदे कामगारांनी आपल्या एकजुटीच्या लढ्यातून मिळविले,त्याचीच मोडतोड करण्यात आली आहे.पण सरकारने त्याची पुनर्स्थापना केली नाही तर कामगारच एक दिवस त्यांना धडा शिकवतील,असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्य मंत्री सचिनभाऊ अहिर यांनी येथे आंदोलनात बोलताना दिला
देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतिने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज देशव्यापी लढ्याची हाक दिली होती.त्या मध्ये बँका,सरकारी कर्मचारी संघटना,असंघटित संघटना सामील झाल्या आहेत.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघा (इंटक)च्या वतीने आज लालबाग,भारतमाता सिनेमा,इंडिया युनायटेड मिल नं.१ च्या गेट समोर जनसंघर्ष आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
त्या वेळी जनसंघर्ष आंदोलनात बोलताना सचिन अहिर पुढे म्हणाले,संविधान दिनाच्या दिवशी कामगारांचे आंदोलन पार पडत आहे,यातून लढ्याला स्फूर्तीच
मिळाली आहे.कामगार आणि शेतकरी विषयक केंद्रात संमत झालेली दोन्ही विधायके महाराष्ट्र सरकार स्वीकारणार नाहीत,असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळात निक्षून सांगितले आहे, या वरुन सरकार कामगारांच्या पाठीशी ठाम आहे,हे दिसून येते.
कामगार संघटना संयुक्त कृती संघटना, महाराष्ट्राचे सहनिमंत्रक विश्वास उडगी,कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप, हिंद मजूर सभेचे शंकर साळवी व संजय वढावकर आदी कामगार नेत्यांची सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर घणाघाती शब्दात टीका करणारी भाषणे झाली.सर्वश्री निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,माजी नगरसेवक सुनिल अहिर,सुनिल बोरकर,राजन लाड, संजय कदम, उत्तम गिते लक्ष्मण तुपे, शिवाजी काळे या पदाधिकार्यांनीही आपल्या भाषणात कामगार वर्गाला देशोधडीला लावणाऱ्या केंद्र सरकारच्या नितीचा खरपूस समाचार घेतला.आंदोलनात मिल पुरुष कामगारांबरोबरच एन.टी.सी.मिलच्या महिला कामगारांनी चांगलाच सहभाग घेतला.
आंदोलनात कामगार विरोधी लेबर कोड बील त्वरीत मागे घ्या, लॉकडाऊन मधील बंद एन.टी.सी.गिरण्या त्वरित सुरू करुन,कामगारांची उपासमार संपवा,रोजगार निर्मिती साठी ठोस पावले उचलून बेरोजगारीवर नियंत्रण आणा,सर्वासाठी मोफत सार्वत्रिक आरोग्य सेवा सुरू करा,असंघटित क्षेत्रातील कामगारांना आरोग्य विमा,पेन्शन, इ.एस.आय, प्रा.फंड इत्यादी सामाजिक सुरक्षिततेचे कायदे लागू करा,सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण था़ंबवा,रेशन व्यवस्था बळकट करा,कोविड मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या आशा, अंगणवाडी,एन.एच एम कर्मचार्यांना संरक्षण द्या आदी १९ मागण्या करण्यात आल्या आहेत.
*कामगारांनी कोरोनाचे सर्व निमय काटेकोरपणे पाळून आंदोलन यशस्वी केले*
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वा खालील पुणे- जयहिंद इंडस्ट्री,महे़ंद्रा अँड महेंद्रा मँग्नेटिक डिव्हिजन,तळोजा-दिपक फर्टिलायझर,गँलंटिक फार्मा,पालघर उत्तर मश्चिमार वहातुक स़घ, के.एल.टी.लिमिटेड,गोराय एक्सल
वर्ल्ड,नवी मुंबई,ठाणे,औरंगाबाद, रायगड, नाशिक-नीलय इंडस्ट्री, कल्याण-ए.एस.बी,खोपोली-मास्को,खालापूर-अंबरनाथ, सांगली,कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणच्या कंपन्या मधील कामगारांनी आपल्या कंपनीच्या गेटवर आंदोलन करून केंद्र सरकारच्या कामगारहित विरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला
◆◆◆काशिनाथ माटल ◆◆◆ दि.२६/११/२०२०


COMMENTS