नांदेड दि.५ जुलै:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive R...
नांदेड दि.५ जुलै:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक पात्र नागरिकाची नोंद सुनिश्चित करणे, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मतदारांच्या तपशीलांचे पडताळणीसह डिजिटायझेशन करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार तसेच डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने आज मनियार गल्ली, इतवारा परिसरात तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड यांनी बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षकांसमवेत प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपअभियंता, विष्णुपुरी प्रकल्प शेख गुलाम, बीएलओ पर्यवेक्षक वडजकर, बीएलओ पवार तसेच तलाठी महेश जोशी उपस्थित होते.यावेळी तहसीलदार संजय वारकड यांनी नागरिकांशी संवाद साधून प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःचा तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचा गणना फॉर्म वेळेत भरून द्यावा, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत आणि बीएलओमार्फत त्याचे तत्काळ डिजिटायझेशन करून घ्यावे, असे आवाहन केले. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी कालावधी मर्यादित असल्याने बीएलओ आपल्या घरी भेट देतील तेव्हा त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.पाहणीदरम्यान तहसीलदार वारकड यांनी मनियार गल्ली येथील खलील अहमद कुरेशी यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा गणना फॉर्म स्वतः भरून घेतला तसेच मोबाईल ॲपद्वारे त्याचे तत्काळ डिजिटायझेशन करून प्रक्रियेची प्रत्यक्ष खात्री केली.तहसीलदार वारकड यांनी यावेळी सांगितले की, मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण हा केवळ प्रशासकीय कार्यक्रम नसून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अचूक व अद्ययावत मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांचा पाया आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS