नव्या युगाच्या नव्या गोष्टी : 'खारूताईचे जंगल' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

डॉ. कैलास दौंड यांनी मोठ्यांसाठी विपुल लेखन केले आहे. तसेच त्यांनी बालकुमार वाचकांसाठी कथा - कविता लिहिल्या आहेत. त्यांचे 'माझे गाणे आनं...


डॉ. कैलास दौंड यांनी मोठ्यांसाठी विपुल लेखन केले आहे. तसेच त्यांनी बालकुमार वाचकांसाठी कथा - कविता लिहिल्या आहेत. त्यांचे 'माझे गाणे आनंदाचे' आणि 'आई, मी पुस्तक होईन' हे दोन बालकवितासंग्रह आणि 'जाणिवांची फुले' हा बालकथासंग्रह प्रकाशित झालेला आहे.

नुकताच त्यांचा 'खारूताईचे जंगल' हा बालकथासंग्रह लाडोबा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहात बारा कथा असून ह्या सगळ्या नव्या युगातील मुलांसाठीच्या नव्या नव्या गोष्टी आहेत. 

'खारूताईचे जंगल' ही पहिलीच कथा खूपच वाचनीय आहे. एका जंगलात एक खारूताई होती. सोबत तिच्या काही मैत्रिणी होत्या. त्या जंगलातील फळे खायच्या. फळांतील बिया नंतर खाण्यासाठी म्हणून जमिनीत पुरून ठेवायच्या. पुन्हा त्या विसरूनच जायच्या. खारूताईंना ही सवयच असते. पावसाळ्यात पाऊस पडल्यावर त्या बिया जमिनीत रुजायच्या. हळूहळू त्या रोपांची मोठी झाडे व्हायची. वर्षानुवर्षे त्यांचा हाच खेळ चालू होता. माणसांनी झाडे तोडल्यामुळे विरळ झालेले जंगल खारूताईंमुळे घनदाट झाले. काही स्वार्थी लोक वाढलेल्या जंगलाचे श्रेय घेण्यासाठी आले. हे जवळच्या एका शेतकऱ्याला समजले. त्याने जंगलाच्या वाटेवर फलक लावला : 'खारूताईचे जंगल'.

बरोबरच आहे ना! ते जंगल माणसांनी नव्हे, तर खारूताईंनी वाढवले होते. ज्याचे श्रेय त्याला मिळायलाच हवे!

'आजी आणि चिमणी' ह्या कथेतही अशीच एक चिमणी आहे. तिचे नाव आहे स्वीटी. नाव किती गोड आहे नाही! स्वीटीने नदीकाठच्या एका झुडपात आपले घरटे बांधले होते य. तिथे इतर पक्ष्यांचीही घरटी होती. एका पावसाळ्यात नदीला महापूर येतो आणि सगळी घरटी वाहून जातात. ह्या आघातामुळे स्वीटी चिमणी निराश झाली. ही जागा सोडून दुसरीकडे जायचा विचार करते. हा परिसर सोडून जाण्यापूर्वी ती गावात फेरफटका मारते. ममताआजीच्या घरातही महापुराचे पाणी शिरलेले असते. आजीचे धान्य भिजून गेले होते. नात आजीला विचारते, 'हे भिजलेले धान्य उकिरड्यावर फेकून देऊ का?' 

आजी म्हणते, 'फेकून देण्यापेक्षा पाखरांना खायला घालू'. स्वीटी चिमणी म्हणते, 'स्वतःला खायला काही राहिलेले नसताना पाखरांना खाऊ घालणारी आजी किती ग्रेट आहे! जोपर्यंत ममताआजीसारखी मायाळू माणसे आहेत, तोपर्यंत निराश होण्याचे कारण नाही'. 

हल्ली लहान-थोरांना मोबाईलचे कसे व्यसन लागले आहे, हे आपण सगळेच जाणतो. 'कॉल केला की हजर' ह्या कथेतील रामूलाही मोबाईलचे असेच व्यसन जडले आहे. रामूचा मोबाईल जरा चमत्कारिकच आहे. एखाद्याला कॉल केला, की तो माणूस त्याच्या मोबाईलमधून बाहेर येतो. आहे की नाही चमत्कार! एके दिवशी रामूने मदतीसाठी पोलिसांना फोन लावला. नेमकी त्याच वेळी त्याच्या मोबाईलची बॅटरी संपली आणि मोबाईल बंद पडला. खरे तर रामूला स्वप्नच पडले होते. त्याला चोर आल्याचा भास झाला होता. मदतीसाठी पोलीस नसले, तरी झोपेतून जागे करून आई मदतीला धावून आली, याचा रामूला आनंद झाला होता. मनी ठसे ते स्वप्नी दिसे, अशी रामूची अवस्था झाली होती. 

'दोन चिमण्या' ह्या कथेतील चिमण्यांची नावे आहेत रिंकी चिमणी आणि पिंकी चिमणी.

खरेतर ही एक रूपककथा आहे. खेड्यातल्या ह्या चिमण्यांना शहरात जायची लहर येते. दोघीही शहरात जातात, पण तेथील परिस्थिती पाहून गोंधळून जातात. कारण सिमेंटच्या तापलेल्या भिंतींवर बसता येत नाही. पिण्यासाठी पाणी नाही. रस्त्यावर खूप सारी वाहने. थांबायला कुठेच जागा नव्हती. एका घराच्या बाहेर पिण्यासाठी पाणी ठेवले होते. खाण्यासाठी धान्य ठेवले होते. 'आयतं खाणं बरं नाही' असे म्हणून पिंकी चिमणी गावाकडे निघून गेली. आयतं खाऊन रिंकी चिमणी ऐदी आणि आळशी बनली. काही दिवसांनी पिंकी रिंकीला आपल्या गावी घेऊन जाते. ह्या कथेत लेखकाने दोन चिमण्यांच्या माध्यमातून बालकुमार वाचकांना क्रियाशीलतेचा संदेश दिला आहे. मधू नावाचा मुलगा जादूगाराची कशी फजिती करतो, हे जाणून घेण्यासाठी 'मधूची धमाल जादूगाराची फजिती' ही कथा मुळातून वाचायला हवी. 

छोट्या सारिकाला पांढरे ढग म्हणजे आभाळाची फुलेच आहेत असे वाटते. ढगांना फुले समजण्याची कल्पना रम्यच म्हटली पाहिजे. 

माणसाने आपल्या हव्यासापायी पर्यावरणाचे कसे शोषण केले आहे, हे समजून घेण्यासाठी 'माणसाची मुक्तता' ही कथा वाचलीच पाहिजे. माणूस शिकारी असतो. तो वृक्षतोड करतो. जंगलाची नासधूस करतो. पाणवठे दूषित करतो. नदीतील वाळू चोरतो. म्हणून 'जंगलात शिरलेल्या माणसाला इथून घालवायला हवे' असे जंगलातील वाघ म्हणतो. म्हणजे प्राण्यांच्या नजरेत माणूस नावाचा प्राणी किती बदनाम झालाय, याची आपण कल्पना करू शकतो. 

सध्या आपल्या समाजात ढोंगी बाबा-बुवांची संख्या वाढली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हे त्याचे मूळ कारण आहे. वाघापूर गावात असाच एक ढोंगी बुवा आला होता. तो लोकांना फसवत होता. अरुण नावाच्या एका शाळकरी मुलाने फोन करून पोलिसांना बोलावून घेतले आणि ढोंगी बुवाला पोलिसांच्या स्वाधीन केले. अरुणच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आणि सजगतेमुळेच हे शक्य झाले. 'माझ्या मुलाने त्याच्या शिक्षणाचा गावासाठी उपयोग केला', याचा त्याच्या वडलांना अभिमान वाटतो. 

आईवडील आपल्या लेकरांसाठी खस्ता खात असतात, याची मुलांनाही जाणीव असलीच पाहिजे. सीता आणि राम यांच्या आईवडलांना परवडत नसतानाही ते आपल्या मुलांना सहलीला पाठवतात. आईवडलांनी स्वतःला कपडे घेण्यासाठी जपून ठेवलेले पैसे सहलीसाठी दिले हे मुलांना समजले. ही मुलेही कष्टाळू आहेत. मुलांनी इतरांच्या शेतात मजुरीने कापूस वेचून पाचशे दहा रुपये जमवले आणि कपडे घेण्यासाठी ते वडलांना दिले. ते समजल्यावर बाबा म्हणाले, 'ही पोर खरीखुरी कापसाची पोर! मऊ मऊ मायेची!'

'पहिल्या भाषणाचे पहिले बक्षीस' ही कथा अतिशय प्रेरणादायी आहे. हल्ली रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. याचे कोणालाच काही वाटत नाही. मधूसारखा एखादा संवेदनशील विद्यार्थी निघतो. रस्ता रुंदीकरणासाठी भलेथोरले वडाचे झाड तोडण्यात येणार होते. मधूच्या आजोबांनी ते लावले होते आणि वडलांनी ते जोपासले होते. मधू सनदशीर मार्गाने ते झाड वाचवतो. त्यामुळे त्या रस्त्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे डोळे उघडतात. तो म्हणतो, 'आयुष्यात काम करत असताना होता होईल तेवढी झाडे वाचवण्याचा मी प्रयत्न करेन'. 

असा निर्धार प्रत्येकानेच केला पाहिजे, तरच पर्यावरणाचे संवर्धन होईल.

मधूसारखीच एक संवेदनशील मुलगी आपल्याला 'मला नको मोराचे पीस' ह्या कथेत भेटते. तिचे नाव आहे शारदा. तिला मोराचे पीस खूप आवडत असते. ती आईवडलांना मोराचे पीस मागत असते. मढीच्या जत्रेत तिला खूप सारे मोरपीस दिसतात. वडील तिला मोरपीस घेऊन द्यायचे मान्य करतात. पण जेव्हा तिला समजले, की लोकांनी मोरांना मारून हे पीस आणले आहेत. तेव्हा ती म्हणते, मला नको मोराचे पीस. मुक्या जिवांविषयी शारदाला वाटणारी संवेदनशीलता फारच महत्त्वाची आहे. ह्या कथांच्या माध्यमातून संस्कारशिल्पे कोरणारा शिक्षक मला फार महत्त्वाचा वाटतो. 

ह्या संग्रहातील पाच कथा ह्या जीवसृष्टी आणि निसर्गाशी संबंधित आहेत. जंगल वाढविणारी खारूताई जंगल नष्ट करणाऱ्या माणसापेक्षा श्रेष्ठ म्हटली पाहिजे. संकटात सापडलेली चिमणी आणि परोपकारी आजी यांचे नाते मानवतेवर आधारित आहे. दोन चिमण्यांच्या स्वभावातील फरक बाळगोपाळांना खूप काही शिकवून जातो. 'आभाळाची फुले' ही कथा निसर्गाकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी देते. डॉ. कैलास दौंड यांची भाषाशैली आणि कथनशैली साधी, सोपी, सरळ आणि ओघवती आहे. लाडोबा प्रकाशनाचे घनश्याम पाटील यांनी पुस्तकाची उत्कृष्ट निर्मिती केली आहे. डॉ. न. म. जोशी यांनी प्रस्तावनेत ह्या पुस्तकाचे वेगळेपण अधोरेखित केले आहे. 

पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन, परोपकार, मानवता, क्रियाशीलता, सजगता, सावधानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, नात्यांमधील संवेदनशीलता आणि सभोवतालच्या सजीवसृष्टीविषयीची स्वागतशीलता इ. मूल्यांचे संस्कार बिंबविणा-या ह्या कथा बालकुमार वाचकांना निश्चित आवडतील, असा विश्वास वाटतो. 

  • 'खारूताईचे जंगल' (बालकथासंग्रह) 
  • लेखक : डॉ. कैलास दौंड 
  • मुखपृष्ठ : ज्योती घनश्याम 
  • आतील सजावट : संजय ससाणे 
  • प्रकाशक : लाडोबा प्रकाशन, पुणे 
  • पृष्ठे ४८      किंमत रु. १००

  • पुस्तक परिचय :
  • डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 
  • sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group