बुद्धाची करुणामय नैतिकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन व्हिजनचा आधार : डॉ. सुखदेव थोरात


 "कल्चरल"ची फुले-शाहू -आंबेडकर- अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला - पहिले पुष्प

नांदेड : प्रतिनिधी

“बुद्धाची करुणामय, मानवतावादी आणि विवेकाधिष्ठित नैतिकता हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन व्हिजनचा कणा आहे,” असे ठाम प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. कल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित फुले–शाहू–आंबेडकर–अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेत “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील रिपब्लिकन व्हिजन” या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.  विठ्ठल खाडे हे होते. 

यावेळी मंचावर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, भदन्त विनय बोधीप्रिय महाथेरो, किशोर खांडेकर, डॉ. गौतम कांबळे, संजय शेंडे, विमल नवसागरे, कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोणारकर, सचिव डॉ. विजयकुमार माहुरे  आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. थोरात म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्ष व संघटना जर बाबासाहेबांचे विचार प्रमाण मानत असतील, तर एकाच विचारधारेवर आधारित इतक्या वेगवेगळ्या संघटना का निर्माण झाल्या, हा गंभीर प्रश्न आहे. बाबासाहेबांचे विचारांचे वेगवेगळे आकलन मांडल्या जातो त्यातूनही घडले. असे सांगून विषमतेला कारणीभूत असलेली जात ही केवळ सामाजिक रचना नसून ती एक सुसंगत विचारधारा व तत्त्वज्ञान आहे. जातीचा विचार हा भेद, श्रेणीक्रम आणि वर्चस्वावर आधारलेला असून इतिहासकाळापासून विषमता, शोषण आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरू आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषमतेच्या मुळावर घाव घालण्यासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्व पातळ्यांवर समतेची रचना उभी करण्याचा विचार मांडला. सामाजिक जीवनात  स्वातंत्र्य, समता व बंधुता राजकीय व्यवस्थेत संसदीय लोकशाही, आर्थिक पातळीवर राज्य समाजवाद आणि सांस्कृतिक जीवनात बुद्धाची करुणामय नैतिकता—या चार आधारांवर बाबासाहेबांचे रिपब्लिकन व्हिजन उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


लोकशाहीवर नितांत प्रेम असलेल्या बाबासाहेबांना भारतातील विविध धर्म, भाषा व जातींनी विभागलेले सामाजिक वास्तव पूर्णपणे ज्ञात होते. त्यामुळेच इंग्लंडसारख्या राजकीय बहुसंख्याकतेऐवजी भारतात कम्युनल किंवा जातीय बहुसंख्याकतेचा धोका अधिक असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. अशा बहुसंख्याकवादात अल्पसंख्याकांचे हक्क दडपले जाऊ शकतात, ही बाबासाहेबांची गंभीर चिंता होती. म्हणूनच संसदेतून निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींनी पंतप्रधानाची निवड करावी आणि मंत्रिमंडळात अल्पसंख्याकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळावे, असे उपाय त्यांनी सुचविले होते.


आज संविधानालाच नव्हे, तर संविधानातील समतावादी मूल्यांनाच विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र समता विरुद्ध विषमता हा संघर्ष जुना असून, इतिहास साक्ष देतो की अखेरीस समतेचाच विजय होतो, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. “हिंदू समाज अस्तित्वात आहे; पण हिंदू धर्म ही नुसती धारणा आहे,” असे बाबासाहेबांचे विधान उद्धृत करत त्यांनी स्पष्ट केले की, जे धर्मराष्ट्र उभारण्याची भाषा करतात, ते प्रत्यक्षात ब्राह्मणी राष्ट्राची संकल्पना पुढे नेत असून त्याचा पाया विषमतेवर आधारित आहे. दलित वंचित शोषित आणि बहुजन समाजासाठी धोकादायक आहे. 


कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.  विठ्ठल खाडे  यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक लोकशाही अजून समाजात पुरेशी रुजलेली नाही. अहंकार आणि आत्ममग्नतेमुळे चळवळी शिथिल झाल्या असून, वैचारिक पातळीवर व्यापक प्रबोधन करूनच या चळवळींना नवसंजीवनी द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.


 प्रारंभी बोधी वृक्षाच्या रोपट्यास मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन उद्घाटन करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी करून दिला. सुरुवातीला पंकज शिरभाते आणि सुरेश दादा तळवटकर यांनी सुरेल आवाजात स्वागत गीत गाईले. 

सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार माहुरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. पंडित सोनाळे यांनी मानले. 


कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारोतराव धुतुरे, इंजी. अनिल लोणे, एस. जे. शिरसे, तुकाराम अटकोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या