सांस्कृतिक प्रतिनिधी नांदेड
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या 'आभाळमाया' या बालकवितासंग्रहाला
साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बालसाहित्याचा महाराष्ट्रातून एकमेव पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा संस्कार भारती परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. संस्कार भारतीचे देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, डॉ. जगदीश देशमुख (देवगिरी प्रांत महामंत्री), जयंत वाकोडकर (नांदेड समिती कार्याध्यक्ष), दि. मा. देशमुख, (माजी अध्यक्ष), डॉ. प्रमोद देशपांडे व प्रकाश पत्तेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना गोरठा येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. सुरेश सावंत यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेताना आलेल्या अडचणींवर मात करत, धवल यश मिळवत साहित्यिक वाटचाल कशी केली, हा प्रवास उलगडला. गोरठा येथील स्वामी वरदानंद भारती (डॉ. अनंत महाराज आठवले) यांच्या सहवासात, त्यांच्याच संस्कारांत साहित्यिक गुण वाढीस लागले. दुर्गुणांपासून दूर राहात आणि चांगल्या गोष्टी अंगीकारत साहित्यिक व्यक्तिमत्त्व घडत गेले, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. अनंत महाराज आठवले हे आपल्याला प्रेमाने 'साहित्याचार्य' असे संबोधत, अशी ह्रद्य आठवणही त्यांनी या वेळी सांगितली.
जयंतराव वाकोडकर यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. जगदीश देशमुख यांनी सावंत यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी डॉ. सुरेश सावंत यांचे पुणेस्थित चिरंजीव डॉ. संकेत सावंत यांचीही उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा