कवी शंकर बोईनवाड लेखक,कथाकार,पत्रकार आहेत.त्यांचं शालेय संकल्प हे साप्ताहिक आहे.आर्थिक स्थिती सर्वसाधारण असूनही त्यांची जिद्द आणि जिज्ञासा, प्रबळ इच्छाशक्ती असल्याने संघर्ष करीत ध्येयाने प्रेरित होऊन वाटचाल चालू आहे.ते कवीही आहेत. 'कोल्हेवाडीचा बाजार' हा बालकविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे.त्यांचा पहिला बालकविता संग्रह 'चिव चिव चिमणी' हा आहे. या बालकवितां संग्रहाला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. कोल्हेवाडीचा बाजार या संग्रहालाही उत्तम प्रतिसाद मिळेल,मिळणार आहे,मिळावा असे मनस्वी वाटते.
यात कविता एकूण 22 आहेत.विविध प्राण्याच्या संवादातून कविता या मुलांना आनंद देणाऱ्या आहेत.संस्कारक्षम आहेत,कल्पक आहेत.या कविता ह्या उपदेशात्मकही आहेत.कवितांना कल्पनेचे भावविश्व लाभले आहे.कविता ह्या मुलांचे भावविश्व फुलवणाऱ्या आहेत.मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी दिशादर्शक आहेत.कविता मुलांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत .पहिलीच कविता वाढदिवसा निमित्त रेखाटलेली आहे.वाढदिवस म्हटल की मुलांच्या आनंदाला मर्यादाच राहात नाही.'पुनमचा वाढदिवस' अशा कविता बालकाच्या आनंदात भर घालणाऱ्या असतात. 'आनंदी आनंद गडे, इकडून तिकडे चोहीकडे' वाढदिवसाच्या गर्दीने पूनम भारावली,प्रत्येकाच्या गिफ्टवर, हळूच नजर फिरवली.बालक बालिकाच्या गर्दीत प्रसन्न मनाने मौजमजा त्यांच्याच मस्तीत मग्न होऊन जातात.पुनमच्या वाढदिवसा सारखाच आपलाही व्हावा असे प्रत्येकाना वाटते.माकडाचा दवाखाना या कवितेत माकड,कोल्हा,वाघ यांचा संवाद उत्तमरीत्या मांडलेला आहे.निमित्त कोल्होबाच्या आजाराचे, माकडाच्या उपचाराचे, माकडाने कोल्होबाला चुकून दिलेले इंजेक्शन आणि वाघोबाने कोल्होबावर केलेले उपचार. माकडाला वाघाने क्षणात संपवले.प्राण्यांचा संवाद वाचनीय आहे. इसाप नितीसारख्या कथांतून प्राण्यांच्या विषयी त्यांच्या कल्पना त्यांच्याच तोंडून जणू तेच बोलत संवाद,न्याय, अन्याय, चीड आदीतून चर्चा,संवाद रूपात वाचताना एक प्रकारचा आनंद होतो.गाढवाची फजिती कवितेत गाढव,राजुची बाग आणि बागेची गाढवाने केलेली नासधूस व गाढवास पळवून लावण्यासाठी केलेली युक्ती वाचनीय आहे.राजुची करामत आणि गाढवाची फजिती उत्तमरीत्या सांगितली आहे.'कोल्हेवाडीचा बाजार' कोल्हा, भाजीपालेवाले,सिंह यांचा बोलका संवाद ,कोल्ह्याच्या माघारी मीटिंग घेऊन बाजारातील खरेदी विक्री उत्तमरीतीने प्राण्याच्याच चर्चेतून वाचकांना खिळवून संवाद वाचतच राहावे असे वाटते.निसर्गाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वर्णन केलेले आहे.जंगलाचे संरक्षण, प्राण्याचे संगोपन ही सहज रित्याने समजून येते.निसर्गाचे संवर्धन काळाची गरज आहे हे सिद्ध होते.कवीची कल्पकता उतम आहे.'आमची आंबू' कवितेतही आंबूचे सावकाराशी बोलणे आणि तिला पाहिजेत असलेलं अडकूल, त्याला ती आयकुन म्हणते, बोबडे बोल परी सावकारास आश्चर्यचकित करून सोडले आणि आडकूल घेऊन प्रसन्न मनाने घरी गेली .
दीपावली अथवा उन्हाळी सुटयात मुले मामाच्या गावाला जातात.'मामाच्या गावाला' कवितेत लहान मुलांना कुतूहल असते. राजू, बंटी यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येतो. शेती, आंबे, विविध खेळ, विटी दांडू,डफ,गोट्या आदी खेळात वेळ कसा निघून जातो हे त्यांना समजत नसे.एक आगळ्या वेगळ्या आनंदात ते मग्न होऊन जातात.'राजुला वाटते अशा सुट्या नेहमीच यावेत शाळेला,मग आपणास मिळेल जायला मामाच्या गावाला' पूर्ण कविता उत्साहपूर्ण,स्वच्छंदपणे खेळण्यात जातो याचे वर्णन कवीने चांगले केले आहे.'पावसाची सुट्टी 'मध्ये मुलांना मौजमजा करण्यात एक वेगळाच आनंद वाटतो.'आमची आई' मध्ये कवी आईने बाळासाठी केलेले वेगवेगळे खाऊ उदा.कलाकंद,इडली,पुरणपोळी इत्यादींचे वर्णन चवीने केले आहे.आई गुणवान,सुगरण तशीच माया याबाबत मुलांना आईबाबतचा जिव्हाळा अवर्णनीय आहे. 'सहल'मध्येही विविध ठिकाणाला भेटी देण्याचा उत्साह,आनंद मुलांमध्ये कितीतरी दिसून येतो हे कवीने उत्तमरीतीने सांगितले आहे.
सचिनचा पतंग उडाला मध्ये एका पाखराने चोच मारली दोऱ्याला ,सचिनचा पतंग उंच उडून गेला। छान पद्धतीने कवितेतून सांगितले आहे. जादूगार ही कविता वाचनीय आहे.जादूचे खेळ संपवून जादूगार निघून जातो आणि मुले जादूगाराच्या खेळाबाबत चर्चेत मग्न होऊन जातात. ससोबाचा वाढदिवस प्राण्याच्या संवाद रूपात साजरा करताना आपापली जवाबदारी कशी पार पाडली, थाटात ससोबाचा वाढदिवस साजरा केला हे उत्तम रीतीने मांडला आहे.
'पुढल्या वर्गात जावे' कवितेत मुलांची मानसिकता विषयी माहिती आहे.मुलांचा दृष्टिकोन स्पष्ट दिसून येतो आहे.शाळेचा कंटाळा,अभ्यासाचा कंटाळा,चाचणी,सहामाही वार्षिक परिक्षा अशातच वेळ जातोय.अभ्यास न करता खेळावे,मनसोक्त आनंद मिळवावा आणि अभ्यास न करताच परीक्षेत नंबर वन मिळवावा.असा आशय सांगितला आहे.'परीक्षेच्या पुढे खूप अभ्यास करावे। फर्स्ट क्लास मिळवून पुढल्या वर्गात जावे। अशी मुलांची मानसिकता सांगितली आहे. 22 वी कविता 'चांदोबाची भेट' ही कविता आहे. चांदोबाला भेटण्याची, गाणे गाण्याची,चांदोबाला भेटावे कसे? सवंगडी मिळून चर्चा करतात .कल्पना मांडतात आणि चांदोबा जवळच उडी मारली.आश्चर्यकारकता दिसून येते.चांदोबा मुलांना दुधावरची साय खावा म्हणतो.मुलांना खिळवून ठेवणारी कविता आहे.'आम्ही एकदाची,खाली दुधावरची साय। आई म्हणे बाळा , दचकून उठलास काय।'मुलांच्या चिकित्सकपणे विचार करावयास लावणाऱ्या,कल्पना सुचणाऱ्या, आशयपूर्ण कविता .कवितांना लय,सूर आहे.चित्र रूपात कवितांचे विश्लेषण केले आहे.त्यामुळे चटकन कवितांचा आशय, महत्व दिसून येते.बालकांसाठी कविता करणे अवघड असते.अशा कवितांतून मुलांचे व्यक्तिमत्व घडते.पाठराखण एकनाथ आव्हाड या सुप्रसिद्ध बाळ साहित्यिकाची आहे.पाठराखणच कवितांचे महत्व सांगून जाते.खरोखरच मुलांच्या ओठावर हसू फुलवणाऱ्या कविता वाचकांना वाचतच राहाव्यात अशा आहेत.
बालकविता संग्रह संग्रही असावा असाच आहे.शंकर बोईनवाड बालकवी म्हणून त्यांच्या हातून कवितांची रचना सतत होत राहावी असे वाटते. शंकर बोईनवाड यांचा कवी लेखक म्हणून नाव लौकिक व्हावा आणि पुढील साहित्य रचनेला हार्दिक शुभेच्छा! मुखपृष्ठ आकर्षक आहे .पाठराखण अत्यंत महत्त्वपूर्ण वाचनीय आहे.
आर.जी.नरले
सेवानिवृत्त प्राचार्य
अष्टविनायक कॉलनी
उदगीर जि. लातूर
कोल्हेवाडीचा बाजार
कवी शंकर बोईनवाड
देणगी मूल्य 51 रु.

COMMENTS