नांदेड : मातंग समाजातील ऊसतोड कामगार शिवाजी गणपत पवळे रा. जानापुरी यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाची, त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्याची तसेच ऊसतोड मुकादमाकडून करण्यात आल्याचा आरोप असलेल्या अन्यायाची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा, या मागणीसाठी पवळे कुटुंबीयांनी ३१ ऑगस्ट २०२६ पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
पवळे कुटुंबीयांनी यापूर्वी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्याने कुटुंबीयांनी आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
निवेदनानुसार, शिवाजी पवळे हे मातंग समाजातील ऊसतोड कामगार असून त्यांचे अपहरण करून डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून सोनखेड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अपहरण, मोटारसायकल चोरी व इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर ऍट्रॉसिटी मधील आरोपी याने पवळे यांच्याकडून कोऱ्या बॉण्ड पेपरवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या व अंगठ्याचे ठसे घेऊन त्यांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. ऍट्रॉसिटी मधील आरोपी आनंदा कळने याने व त्याच्या जानापुरी येथील नातेवाईकांनी पवळे कुटुंबातील पीडितावर ऍट्रॉसिटी केस मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव आणला होता.
तडजोड न करण्याची भूमिका पवळे कुटुंबियांनी घेतल्यामुळे २०२५ मध्ये वजीराबाद पोलीस ठाण्यात शिवाजी पवळे यांच्याविरुद्ध सीआर नंबर ६८/२५ नुसार फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा दबाव आणण्यासाठी दाखल करण्यात आला आहे.
पवळे यांचे ट्रॅक्टर ताब्यात ठेवून थकीत रक्कम न दिल्याचा आरोप
पवळे कुटुंबीय ऊसतोड कामगार असून २०२५-२६ च्या हंगामात कर्नाटकातील नारंजा सहकारी साखर कारखान्यात ऊसतोडीचे काम केल्याचे निवेदनात नमूद आहे. कामाचा हिशोब व थकीत रक्कम मागितल्यानंतर ऊसतोड मुकादम शेख मुस्तफा यांनी पवळे कुटुंबीयांचा ट्रॅक्टर वाजेगाव येथून नेऊन पैसे दिल्याशिवाय ट्रॅक्टर परत देणार नसल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. हा ट्रॅक्टर मागील पाच ते सहा महिन्यांपासून मुकादम शेख मुस्तफा याच्या ताब्यात आहे.त्याच एक लाख रुपया चे नुकसान शेख याने अनेक वेळा पीडित पवळे कुटुंबियांना व ऍट्रॉसिटीतील ६ पीडितांना वेळोवेळी जातीवाचक शिवीगाळ व बरेवाइट करण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
शेख मुस्तफा यांनी पवळे कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा, कोऱ्या बॉण्ड पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्याचा तसेच तक्रार केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
गणेश शिवाजी पवळे यांनी २५ जुलै २०२६ रोजी वजीराबाद पोलीस ठाण्यात शेख मुस्तफा याच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच ६ महिन्यापासून ट्रॅक्टर बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवणे व थकीत रक्कम न मिळाल्याबाबत तक्रार दिल्याचे नमूद आहे. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी करावी, शिवाजी पवळे यांच्याविरुद्ध दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याची चौकशी करावी, कोऱ्या बॉण्ड पेपरवरील स्वाक्षऱ्या व अंगठ्यांच्या ठशांच्या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच संबंधित पोलीस अधिकारी व आरोपी यांच्यातील मोबाईल सीडीआर तपासावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबाला कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, त्यांच्यावर कोणताही दबाव येणार नाही याची दक्षता घ्यावी आणि ऊसतोड मुकादम शेख मुस्तफा यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी, अशीही मागणी आहे.१ सप्टेंबर रोजी वजीराबाद पोलीस स्थानकाचे पोलीस उप निरीक्षक श्री सुनील बुलंगे यांनी उपोषणार्थीना उपोषण स्थळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन धमकावले असून त्यांच्यापासून धोका असून ते पीडित कुटुंबियांना नाहक त्रास देत आहेत.
३१ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पवळे कुटुंबीयांच्या मागण्यांवर निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
पीडित पवळे कुटुंबियांना न्याय मिळाला नाहीतर डावे पक्ष संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.
मातंग समाजाच्या संघटना देखील आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत अशी माहिती उपोषणार्थी गणेश पवळे, मनोज पवळे, सत्यभामा भ्र. शिवाजी पवळे, सोनाजी कांबळे, धोंड्याबाई पि. गणपती पवळे यांनी दिली आहे.
-गणेश शिवाजी पवळे,
उपोषणार्थी,
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
दि. 2 सप्टेंबर 2026
मो.+91 99223 65456

COMMENTS