मरळक येथे कीर्तन सोहळ्याचा हजारो भाविकांनी घेतला आनंद नांदेड :आ. बालाजीराव कल्याणकर हे अत्यंत प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांना ...
मरळक येथे कीर्तन सोहळ्याचा हजारो भाविकांनी घेतला आनंद
नांदेड :आ. बालाजीराव कल्याणकर हे अत्यंत प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांना सतत आपल्या मतदार संघातील जनतेच्या विकासाची तळमळ असते. ते खऱ्या अर्थाने लोकसेवक आहेत. ईश्वर त्यांना लोककल्याणासाठी उदंड आयुष्य देऊ ही आई तुळजा भवानी आणि मरळकच्या विमलेश्वर चरणी प्रार्थना करतो . मी आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या पाठीशी कायम उभा आहे . अशा शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शेतकरी बांधव , भगिनी , वारकरी यांनाही शुभेच्छा दिल्या. पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी एकही रुपया कमी पडू देणार नाही. अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिल.आ. बालाजीराव कल्याणकर , सौ. संध्याताई कल्याणकर यांच्यासह आ. आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे, किशन कल्याणकर , जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, दर्शनसिंग सिद्धू, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अपर्णा नेरलकर , मंगेश कदम, श्याम वानखेडे,संतोष भारसावडे , अनिल पाटील बोरगावकर, बाळासाहेब पावडे,आदींची यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान संतांच्या विचारांचा आणि शिकवणीचा अंगिकार केल्यास जीवनाला योग्य दिशा मिळून त्याचा उद्धार होतो, असे प्रतिपादन हभप विशाल महाराज खोले यांनी केले. आ. बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त मरळक येथे आयोजित भव्य कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.
युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश शिंदे मरळककर यांच्या नियोजनात आयोजित कीर्तन सोहळ्यात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांना मार्गदर्शन करताना खोले महाराज म्हणाले की, संतांनी समाजाला सदाचार, परोपकार, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला आहे. संतांच्या शिकवणीचे आचरण केल्यास व्यक्तीचे जीवन सुखी, समाधानी आणि संस्कारित होते. समाजात वाढत असलेल्या विविध समस्यांवर संतविचार हेच प्रभावी औषध असल्याचेही त्यांनी सांगितले.
कीर्तनामध्ये संतांच्या अभंगांचे निरूपण, हरिनामाचा गजर आणि आध्यात्मिक विचारांची मेजवानी लाभल्याने भाविक मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. उपस्थितांनी टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा आनंद लुटला.
आ. बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.
कीर्तनानंतर नगर भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनीही यावेळी मनोगतातून शुभेच्छा दिल्या. याच ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तर भव्य रक्तदान शिबिरही उत्साहात पार पडले.
जनतेच्या सुखात माझे सुख : आ. बालाजीराव कल्याणकर
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या , नागरिकांच्या सुखात मी माझे सुख मानतो. तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून मी दुसऱ्यांदा आमदार होऊ शकलो. ही आमदारकी तुमच्या चरणावर मी अर्पण करतो. तुमचा आणि विमलेश्वरचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे तो कायम असावा अशी भावनिक साद आ. बालाजीराव कल्याणकर यांनी यावेळी उपस्थिताना घातली


COMMENTS