मानवतेचे प्रतिबिंब उमटविणारे एकच साहित्य असते - डॉ.वासुदेव मुलाटे



नांदेड.

मानवाच्या दुःखाची व मानव मुक्तीचे साहित्यातून प्रकटीकरण होत असताना ते एक साहित्य एकमेव साहित्य असते त्यात दलित - ग्रामीण असा भेद करण्यात येऊ नये , शोषित , वंचित हे घटक साहित्याचे केंद्रबिंदू असले पाहिजेत असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांनी काढले .

पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथील मराठी विषयाचे प्रा. डॉ.नारायण शिवशेट्टे लिखित ' ग्रामीण आत्मकथनात्मक वाङ्मय एक अभ्यास ' या समीक्षा ग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना आपली भूमिका मांडली. 

  स्वरूप प्रकाशन पुणे तर्फे आयोजित समीक्षा ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन पीपल्स कॉलेज नांदेड येथील कै. नरहर कुरुंदकर सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले ' ग्रामीण आत्मकथनात्मक वाङ्मय : एक अभ्यास' या समीक्षा ग्रंथावषयी आपले भूमिका मांडत असताना त्यांनी , ' ग्रामीण आत्मकथनावर अधिक समीक्षा झालेली नाही, मुळात ग्रामीण आत्मकथने कमी प्रमाणात लिहिली गेली, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यासाठी सत्य सांगण्याची हिंमत लागते.ही हिंमत दाखवणाऱ्या आत्मकथनावर केलेली समीक्षा अधिक मोलाचे वाटते ' अशा शब्दांत मत व्यक्त केले आहेत. 

 'ग्रामीण आत्मकथनात्मक वाङ्मय : एक अभ्यास' या प्रकाशित  समीक्षा ग्रंथावर भाष्य करीत असताना प्राध्यापक डॉ.सिद्धोधन कांबळे यांनी ,' साहित्यिकांनी साहित्य निर्मिती करत असताना गाव व गावकुसाबाहेरील असा भेद करून साहित्य निर्माण करू नये . त्यामुळे माणूस हा साहित्यातला केंद्रबिंदू राहत नाही.' अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली .

या ग्रंथावर भाष्य करताना कथाकार डॉ.शंकर विभुते यांनी या समीक्षा ग्रंथाची ओळख करून देत आजच्या पिढीने वाचन संस्कृती कशी विकसित केली पाहिजे या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक रामप्रसाद तौर आणि जेष्ठ लेखिका डॉ.मथु सावंत यांची शुभेच्छापर भाषणे झाली.

   समीक्षा ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास प्राचार्य  डॉ. नागनाथ पाटील, डॉ.जगदीश कदम , दैनिक उद्याचा मराठवाडा चे संपादक राम शिवडीकर,  डॉ. सुरेश सावंत, डॉ.भगवान अंजनीकर, दत्ता डांगे  डॉ. अनंत राऊत, डॉ.प्रकाश मोगले डॉ.श्रीनिवास पांडे, दत्ता तुमवाड, के. ई. हरिदास, डॉ.मा.मा.जाधव, डॉ डी. एन. मोरे, डॉ. जे. टी. जाधव, डॉ आनंद नरंगलकर, डॉ आर जे गायकवाड, डॉ बाळु दुगडुमवार, अमृत तेलंग,  शिवाजी जोगंदड तसेच  नांदेड जिल्ह्यातील शिक्षण, साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि पानसरे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांची उपस्थिती होती. 

 अतिशय  भव्य दिव्य अशा समीक्षा ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.गोपाळ चौधरी तर आभार संतोष साखरे यांनी व्यक्त केले आहे.

टिप्पण्या