स्वारातीम’ विद्यापीठाच्या वतीने शिवरायांना अनोखी मानवंदना

‘शिवराज्याभिषेक-३५०’ निमित्ताने विद्यापीठात विभागीय पोवाडा स्पर्धेचे आयोजन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे प्रेरणादायी जीवन आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून महाराष्ट्र शासनाने या अनुषंगाने विविध उपक्रम व कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्या निमित्ताने रयतेच्या डोक्यावर सुखाचे छत्र धरणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी विचार आणि कार्यांचा जागर व्हावा, विविध अंगाने तो संदेश लोकांपर्यंत जावा या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वा. विभागीय भव्य ‘पोवाडा’ स्पर्धेचे आयोजन करून विद्यापीठाच्या वतीने शिवरायांना अनोखी मानवंदना दिली जाणार आहे. अशी माहिती स्पर्धेचे संयोजक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी दिली आहे. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ओजस्वी घटना प्रसंगांवर आधारित पोवाडयांच्या सादरीकरणातून विद्यार्थी कलावंत स्फूर्ती गीतातून शिवचरित्राचे सादरीकरण करणार आहेत.

विभागीय पोवाडा स्पर्धेतील विजेत्या संघास प्रथम पारितोषिक १०,००० (दहा हजार रुपये) व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक ७५०० (सात हजार पाचशे रू.) व स्मृतिचिन्ह तसेच तृतीय पारितोषिक ५००० (पाच हजार रुपये) व स्मृतिचिन्ह देण्यात येईल. विद्यापीठ परिक्षेत्रातील बहुसंख्य महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव आणि स्पर्धा समन्वयक प्राचार्य डॉ. मा.मा. जाधव यांनी केले आहे.


टिप्पण्या