{आमदार राजेश पवार जनता दरबारामध्ये गरजले!} [आमदारांच्या जनता दरबारास उदंड प्रतिसाद!] धर्माबाद (सरफराज अहमद) कुठल्याही भाषेत समजून सांगितल...
{आमदार राजेश पवार जनता दरबारामध्ये गरजले!}
[आमदारांच्या जनता दरबारास उदंड प्रतिसाद!]
धर्माबाद (सरफराज अहमद) कुठल्याही भाषेत समजून सांगितले तरी मुद्दामहून नागरिकांची विविध विभागातील प्रकरणे प्रलंबित ठेवणे, कामे तात्काळ निकाली काढण्यासाठी हयगय करणे, कामामध्ये सातत्यपूर्ण उदासीनता ठेवणे व अर्थपूर्णरित्या तात्काळ कामे करून देणे हे प्रशासनाच्या अंगवळणी पडले असून यापुढे जर नागरिकांच्या समस्या बाबत, कामाबाबत हलगर्जीपणा झाला तर प्रत्येक विभागाचा वेगळा जनता दरबार घेऊन कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या घटकापासून ते उच्च वर्गीय अधिकाऱ्यापर्यंत त्या जनता दरबारात बोलावून सर्वसामान्यांची प्रश्न तात्काळ सोडवण्याबरोबरच दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांना निलंबित करणारच असा गर्भगळी इशारा आमदार राजेश पवार यांनी तहसीलच्या प्रांगणातील जनता दरबारात दिला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासून थेट दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती दिनानिमित्त शासनाने सेवा पंधरवाडा जाहीर केला असून त्या अनुषंगाने जनतेची, सर्वसामान्यांची विविध कार्यालयातील समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न जागेवरच निकाली काढण्याचे प्रशासनास आदेश दिले होते. त्या अनुषंगाने धर्माबाद मध्ये आमदार राजेश पवार यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. या जनता दरबारास जवळपास एक हजार लोकांचा आपल्या समस्या घेऊन उदंड प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत आमदार राजेश पवार यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद सदस्या सौ. पुनमताई पवार, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, बाजार समितीचे संचालक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश अण्णा गौड, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विजय डांगे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बजाज, पोलीस निरीक्षक संजय हिबारे, महावितरणचे सुमित पांडे, उमरी वनविभागाचेपेरलेवाग व कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नरवाडे, पंचायत विस्तार अधिकारी विश्वास आधापुरे,व बहुतांशी विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी नायब तहसिलदार, ग्रामसेवक यांचा समावेश होता.
या जनता दरबारात प्रामुख्याने अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन शासन निर्णयानुसार निधी वितरण करणे, पंतप्रधान किसान सन्मान योजना तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वितरण करणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतर नोंद घेणे, नव्यानेच नळ जोडणी देणे, मालमत्ता करांची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरण विद्युत जोडणी मध्ये मालमत्ता धारकाचे नाव नोंदणी, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरी करता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित न्यायप्रविष्ट सोडून वन हक्क पट्टे मंजूर करणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र देणे इत्यादी विषयांचा समावेश असल्यामुळे हजारो नागरिकांमधून विविध विषयाबद्दल तक्रारींचा पाऊस पडला. आमदार राजेश पवार यांची काम करण्याची पद्धत जी जागेवरच निर्णय, त्या कामाचा तात्काळ संबंधित अधिकाऱ्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर फोनवर पाठपुरावा व लागलीच कार्यवाही ही पद्धत पाहून अनेकवेळा टाळ्यांचा कडकडाट पडला.
पण एवढे असूनही यापूर्वीही दोन जनता दरबारात अशाच प्रश्नाचा पाऊस पडून आमदार राजेश पवार यांनी तात्काळ सदरील कामे पूर्ण करण्याचे आदेश देऊनही कर्मचाऱ्यांची उदासीनता, मुद्दाम जनतेचे प्रश्न प्रलंबित ठेवणे, ते निकाली न काढणे व अर्थपूर्णरित्या कामे करणे हे पुन्हा एकदा सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाल्यामुळे आमदार राजेश पवार यांचा संताप अनावर झाला. त्या अनुषंगाने त्यांनी महसूल विभाग असो पुरवठा विभाग असो किंवा वीज वितरण कंपनी असो किंवा घरकुल योजना असो याविषयीची वर्गवारी करून प्रत्येक विषयांचा वेगळा जनता दरबार यापुढे भरवणार व जनतेची प्रश्न तात्काळ निकाली काढतच दोषी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निलंबित करणारच अशी गर्जनाच केली. त्यामुळे खरोखरच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे.

COMMENTS