स्वातंत्र्यसैनिक, मुंबईचे माजी महापौर, आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ कामगार नेते व गोदी कामगारांचे दैवत डॉ. शांती पटेल यांना ८ ऑगस्ट २०२१ रोजी ९९ वर्ष पूर्ण होऊन १०० वर्ष म्हणजेच त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने माझगाव येथील कामगार सदन येथील कार्यालयात डॉ. शांती पटेल यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये, युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, युनियनचे पदाधिकारी सर्वश्री विद्याधर राणे, दत्ता खेसे, विकास नलावडे, अहमद काझी, निसार युनूस, संदीप कदम, शशिकांत बनसोडे, शीला भगत, मारुती विश्वासराव, संदीप चेरफळे, विष्णू पोळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जन्मशताब्दी वर्षात विविध विषयावर कामगारांसाठी व्याख्याने, कामगार शिबिर, रक्तदान शिबिर, अशा विविध कार्यक्रमांचे युनियनच्या वतीने आयोजन करण्यात येईल.
डॉ. शांती पटेल यांच्यावर महात्मा गांधी विचारांचा पगडा होता. त्यांनी शेवटपर्यंत समाजवादी विचारांची मूल्य जपली. मुंबईचे महापौर असतांना गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यासाठी जागा व मुंबईतील रुग्णालयासाठी चटईक्षेत्र वाढून देण्यामध्ये डॉ. शांती पटेल यांची महत्वाची भूमिका होती. कामगारहिताच्या विरुद्ध असलेल्या आणीबाणीला विरोध केल्यामुळे डॉ . शांती पटेल व ऍड. एस. के. शेट्ये यांच्यासाहित २३ कार्यकर्त्यांना नाशिक जेलमध्ये अटक करण्यात आली होती. मुंबई पोर्ट ट्रस्टचे ते ६२ वर्षे विश्वस्त होते. भारतातील प्रमुख बंदरातील कामगारांसाठी डॉ. शांती पटेल यांनी कामगार नेते कॉ. एस. आर. कुलकर्णी इतर कामगार महासंघाच्या सहकार्याने बंदर व गोदी कामगारांचे अनेक वेतन करार करून गोदी कामगारांना चांगली पगारवाढ व पेन्शन मिळून दिली. जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधान असताना राज्यसभेत कामगारहीत विरोधी बील आले तेंव्हा डॉ. शांती पटेल यांनी कडाडून विरोध केला होता. एवढेच नव्हे तर सर्व केंद्रीय कामगार संघटनांना एकत्र करून लोकसभेवर प्रचंड मोर्चाही काढला होता. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्याबरोबर चांगले सहकार्याचे संबंध होते. मुंबई महानगर पालिकेत असताना नवी मुंबईचा आराखडा करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. अशाप्रकारे समाजकारण, राजकारण व कामगार चळवळीत निरपेक्षपणे शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणारे डॉ. शांती पटेल यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोदी कामगार व इतर कामगार वर्गातर्फे विनम्र अभिवादन.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिदीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS