नांदेड. (विशेष प्रतिनिधी) काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपी तरूणांनी एका ४३ वर्षीय शेतकऱ्याच्या गळ्याला खंजीर लावून रोख १० हजार ५०० रूपये व मोबाईल असा एकूण तब्बल २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला आहे. ही घटना सहा ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊवाजेचेदरम्यान, नवीन नांदेडातील कौठा शिवारामधील आदीनाथ चौक परिसरात घडली. नवीन नांदेड भागातील जुना कौठा येथील रहिवासी तथा शेतकरी अनिल साहेबराव काळे हे नेहमीप्रमाणे ६ ऑगस्ट रोजी दिवसभर शेतीतील कामकाज आटोपून रात्री नऊवाजेदरम्यान, एमएच- २६, एएम- ४६९३ या दुचाकीवरून जुना कौठा येथील घराकडे निघाले. दरम्यान, शेतकरी अनिल काळे यांची उपरोल्लेखित मोटारसायकल ६ ऑगस्ट रोजी रात्री सव्वानऊ वाजेचेदरम्यान, आदीनाथ चौकात येताच काळे यांच्या पाठीमागून एका काळ्या 'पल्सर'वर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी काळे यांच्या दुचाकीसमोर आणून थांबवली. त्याचवेळी, 'ते' तिघेजणही शेतकरी अनिल काळे यांच्याजवळ गेले आणि त्यापैकी एकाने आपल्या गळ्यावर खंजीर लावला, तर अन्य दोघांनी आपल्याजवळील रोख साडे दहा हजार तसेच १७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा एकूण २७ हजार ५०० रूपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला, असा आरोप शेतकरी अनिल काळे यांच्या तक्रारीमध्ये नमूद असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, आपल्याजवळील उपरोल्लेखित ऐवज हिसकावून घेतल्यानंतर 'ते' हस्सापूर ब्रिजकडे निघून गेले असल्याची माहिती शेतकरी अनिल काळे यांनी दिलेल्या तक्रारीतच नमूद केली आहे. याशिवाय, काळ्या 'पल्सर'वर आलेले 'ते' तीन इसम हे २० ते २५ वर्षे वयोगटातील असून, त्यापैकी दोघांच्या डोक्यावर पगडी होती, तर एकाच्या डोक्यावर बारीक केस होते, असा उल्लेख करून त्या तिघांना पाहिल्यानंतर आपण ओळखू शकतो, असा आत्मविश्वास शेतकरी अनिल काळे यांनी तक्रारीमध्ये व्यक्त केला असल्याचीही माहिती ठाणे अंमलदार तथा सपोउपनि. डी. एन. मोरे यांनी दिली.
याप्रकरणी अनिल साहेबराव काळे यांनी अखेर ७ ऑगस्टच्या रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्र. पो. नि. अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. आनंद बिचेवार व पोलीस नाईक दिलीप चक्रधर हे याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS