*मुंबई: 7 एप्रिल:* कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या निधनाने कामगार चळवळीची कधीही भरुन न येणारी हानी झाली असून,कामगारांच्या प्रश्नांवर कायम धडाडणारी तोफ थंडावली, अशा भावपूर्ण शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस,शिवसेना उपनेते आणि माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी इस्वलकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि गिरणी कामगार लढ्यात सर्वस्व वाहाणारे ज्येष्ठ कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे वयाच्या ७२व्या वर्षी जेजे हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अल्पशा आजारात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.
गिरणी कामगारांची थकीत देणी आणि घरांच्या प्रश्नाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आपल्या राज्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण सर्व कामगार चळवळीतील नेत्यांना मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं, या आवाहनाला सर्वप्रथम इस्वलकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं मा. अहिर म्हणाले. सर्व गिरणी कामगार नेत्यांना एकत्र आणत आणि सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी गिरणी कामगारांच्या घराचा न्याय लढा यशाच्या मार्गावर नेल्याचंही मा. अहिर म्हणाले. कामगार चळवळीचा जणू चालता बोलता इतिहासच त्यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेल्याचेही त्यांनी सांगितले.
दत्ता इस्वलकर आयुष्यभर कामागारांच्या प्रश्नावर लढत राहिले आणि म्हणूनच त्यांची आठवण कामगारांमध्ये कायम राहिल, अशी भावना गोविंदराव मोहिते यांनी व्यक्त केली. उर्वरित कामगारांच्या घराचे स्वप्न पुर्ण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असंही मा. सचिन अहिर आणि मा. गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई आणि उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर यांनीही इस्वलकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
◆◆◆

COMMENTS