माजलगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील दिंदृड गावातील माजी सैनिक मुंडे कुटुंबीय मागील पाच-सहा दिवसापूर्वी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. सरकारी जागेची बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय जमीन विक्री केल्याचा आरोप माजी सैनिकाने केला होता परंतु सदर जागेचे दसेऐवजावरून प्रत्यक्ष मोजणी केली असता कुठेही शासनाच्या जागेत सैनिकांची जागा नसल्याचे निष्पन्न झाल्याने मोठा गाजावाजा करून शासनाला तब्बल पाच दिवस वेठीस धरत केलेले आंदोलन हे अखेर दिशाहीन ठरल्याने माजी सैनिक कुटुंबावर आंदोलन सोडून उठून जाण्याची नामुष्की ओढवली.
दिंदृड येथील सर्वे नंबर 713 मधील जमीन ही सन 2016 मध्ये गणपत सोपान ठोंबरे यांनी सुमनबाई मुंडे यांना विक्री केली होती. विक्री नंतर सदर जागेचा ताबा देखील सुमनबाई यांना दिला होता त्यावर बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम देखील केलेले आहे. परंतु शासनाच्या कोणत्याही खात्याची तुम्ही सरकारी जागेत अतिक्रमण केल्या बाबत अथवा इतर बाबीची नोटीस नसताना देखील विनाकारण ग्रामसेवक राजकुमार झगडे आणि माजी उपसरपंच युवराज ठोंबरे यांनी शासकीय जमिनीचे बोगस कागदपत्रे तयार करून मला शासकीय जागा विक्री केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी करीत दिनांक 18 जानेवारी ला उपोषण केले होते या वेळी गटविकास अधिकारी यांनी चौकशी करिता एक महिन्याची मुदत दिली होती. त्यानुसार जागेच्या मोजणीसाठी ग्रामपंच्यातची रीतसर फीस भरून भूमिअभिलेख कार्यालयाला मोजणी करण्यास सांगितले. तातडीची मोजणी फीस भरून देखील भूमिअभिलेख कार्यालयातील कांही कर्मचारी हे रजेवर असल्यामुळे मोजणीला वेळ लागत होता. दरम्यान सुमनबाई यांनी गटविकास अधिकारी यांच्यावर वेळेत चौकशी न केल्यामुळे शिस्तभंगाची कार्यवाही करावी या मागणीसाठी दि. 25 फेब्रुवारी पासून पांच्यातसमिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. यावर प्रशासनाने तात्काळ मोजणी विभागाला कळवून मोजणी करण्यास सांगितले असता दि. 2 फेब्रुवारी रोजी या जागेची मोजणी झाली ज्यात कुठेही सदर जागा ही शासनाच्या जागेत नसल्याचे दि. 3 फेब्रुवारीच्या अहवालावरून स्पष्ट झाले तसेच तत्कालीन ग्रामसेवक राजकुमार झगडे, माजी उपसरपंच युवराज ठोंबरे यांच्यावर केलेल्या आरोपात देखील कसलेच तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने आंदोलक सुमन मुंडे व माजी सैनिक सुरेश मुंडे यांची चांगलीच गोची उडाली त्यामुळे आंदोलक कुटुंबाने सातबाराला नाव लावून देण्याची वेगळीच मागणी समोर आणल्याने अखेर पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आल्यानंतर आंदोलकांना येथून नामुष्की ओढावून घेत काढता पाय घ्यावा लागला.
-- बच्चू कडू यांच्या प्रहारची फुकटची हलगी !
राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रहार ही संघटना विशेषत्वाने शेतकरी , मजूर, कामगार, निराधार यांचे प्रश्न सोडवणार प्रभावी संघटना आहे मात्र या प्रकरणी नीट अभ्यास न करता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फुकटची हलगी पंचायत समितीसमोर वाजविल्याने व अहवालात काहीही निष्पन्न न झाल्याने नामुष्कीची पाळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर आली त्यामुळे यातून जनतेत बच्चू कडू यांच्या नावाला स्थानिक पदाधिकारी बट्टा तर लावत तर नाहीत ना अशी चर्चा ऐकावयास मिळत होती.
-- नाहक बदनामी सहन केली जाणार नाही -- ग्रामसेवक संघटना
कोणीही उठतो आणि कसलीही शहानिशा न करता ग्रामसेवकांवर चुकीचे आरोप करतो त्यामुळे ग्रामसेवकांवर विनाकारण मानसिक ताण सहन करावा लागतो हा प्रकार चुकीचा असून येथून पुढे नाहक ग्रामसेवकांची बदनामी सहन केली जाणार नाही असा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे.
COMMENTS