माणसासारखाच प्राण्यांना ही जीव आहे.त्यांची अधिवासाची ठिकाणे आणि साधणे माणसाने
हिरावून घेतल्याने ते मानवी क्षेत्रात वावरत आहेत.
ज्याप्रमाणे बेघर लोक स्थलांतर करतात.ज्या ठिकाणी जातील तेथे ते अन्न पाण्याचा शोध घेतात.अगदी त्याप्रमाणे हे प्राणी देखील नियमित स्थलांतरित होत असतात. परंतू तोपर्यंत आपण आपली काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. रेडीओ मोबाईल वर गाणी वाजवा.
याची सोय नसेल तर तोंडाने गाणी गाण्याचा प्रयत्न करा.सोबत बासरी,पावा किंवा थाळी ठेवा. आणि बेसूर का होईना वाजण्याचा गाण्याचा प्रयत्न करा. पूर्वी चे लोक शेतीची कामे करताना, गुरे चारताना सुंदर गाणी म्हणायची. गुराखी पावा वाजवायचे किंवा शिट्टी वाजवायचे. आरोळी, हाळी देऊन एकमेकांना आवाज - प्रतिसाद द्यायचे. यामागे मनोरंजन हे कारण नसून त्या व्दारे ते हिंस्त्र प्राण्यांना स्वतःच्या अधिवासाची सूचना देवून दूसरीकडे जाण्यासाठी केलेला तो इशारा होता. जीव हा प्रत्येकालाच असतो. एक जीव दुसर्याच्या जीवावर मुद्दामहून विनाकारण कधीच उठत नाही. किंवा एकमेकांच्या वाटेत आडवे येत नाहीत. माणसांच्या तर अजिबात नाही.
म्हणून जुन्या पिढीचे जसे की, आजोबा- पणजोबांचे काही गुण घेणे आवश्यक आहे.त्यांच्या काळात प्रत्येक गावशिवारात वाघ, बिबटे, तरस असे प्राणी असायचे. लांडगे,कोल्हे, उदमांजर अशांचे दर्शन तर रोजच व्हायचे. तरीही ती माणसं निसर्गातील प्रत्येक वन्यप्राण्यांच्या सोबत... तितक्याच धाडसाने आणि प्रेमानं वावरत होते,रहात होते.
आज एक बिबट्या दिसला किंवा नुसत्या अफवेने लोकांचे पाणी पाणी होत आहे.काही घटना दुर्दैवी आहेत. त्यासाठी वनकर्मचारी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.तोपर्यंत शेतकऱ्यांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.दिवाळीला आपण बीन कामाचे फटाके वाजवतो. रात्री, विशेषतः वस्तीवर रहाणार्या लोकांनी रात्री दर तासाला एक फटाका वाजवावा. किंवा हसडाच्या वादीचा आवाज काढावा.या पध्दतीने वस्तीवर जेवढी घरे आहेत त्यांनी हा क्रम चालवावा.पूर्वी शेतमाळावर जनावरांच्या जागली असायच्या. त्यांना 'जागल' का म्हणत असतील ? याचा अर्थ आज उमगतोय. आता जागली ऐवजी वस्त्या आहेत. दहा पाच घरांच्या तर नक्कीच आहेत. भिण्याचे काय करण..! एकाला दुसरा सोबती आहेच...ज्वारीच्या दिवसात तर शेताच्या मधोमध 'माळा' घातला जायचा. वन्य प्राणी व पक्षी यापांसून संरक्षण करण्यासाठी...! शेताला पाणी देण्यासाठी दिवसा मोटेचं पाणी आणि राञी माळ्यावर एक एकटं जागरण... काळ बदलला, आता राञी शेताला पाणी दिवसा गावभर मोकळीक. तात्पर्य एवढेच पन्नास वर्षांपूर्वीची शेती आणि आताचा शेतकरी यात खूप बदल झाला आहे. असे असले तरी शेतकऱ्याने नेहमी सावधान असले पाहिजे. मग बेफिकीरी ही नेहमीच धोक्याची असते. गावावर,शेतीवर आणि भूभागावर आपण स्वामित्व गाजवीत असलो तरी ते निसर्गाच्या दृष्टीने आपल्या मालकीचे नाही.हा अधिकार एकेरी आहे. प्रत्येक भूभागावर माणसांपेक्षा ही अधिक इतर हजारो जीवांचा अधिकार प्रथम आहे. कारण निसर्ग शक्तींना कागदपञ वाचता येत नाहीत. गरीब,श्रीमंत असा भेद कळत नाही.संत ज्ञानेश्वर माऊलींनी सृष्टीचा व जीवांचा व्यापक अर्थ पसायदानाने समजून सांगितला आहे.
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडळी |
भेटतू भूतां|
चला कल्पतरूंचे आरव |
चेतना चिंतामणीचे गाव |
बोलते जे अर्णव |
पीयुषांचे |
प्रत्येक ओळीत माऊलींनी निसर्ग व मानवी भाव यांना जोडले आहे. कारण निसर्गाची भाषा मानवी शब्दांची नसून 'चेतना' संपन्न आहे.
तरी, सध्याच्या परिस्थितीत आपण सावध राहून,आपला जीव कशाप्रकारे वाचवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, शेतात खाली वाकून काम करत असतांना आपण आजूबाजूला बारीक लक्ष देऊन काम केले पाहिजे कारण आपण खाली वाकल्यावर बिबट्या आपल्याला चार पायांचे जनावर समजून आपल्यावर हल्ला करतो,त्यामुळे आपण काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच रात्री शेतात जाताना एकटे जाणे घातक आहे, आपण आपल्यासोबत दोन-चार जण सोबतीला ठेवावेत, तसेच मोठमोठ्याने रेडिओ,मोबाईल मधील गाणे लावून कामे करावीत.
आपण सर्वांनी जागृत राहून काळजी घ्यावी. आपलाच- किसानपुत्र- श्रीकांत गदळे
मो.7798607054

COMMENTS