नांदेड : लग्नसमारंभातील अवाजवी खर्चाला फाटा देत, सामाजिक बांधिलकी जपणारा एक अनोखा विवाह सोहळा नुकताच येथे पार पडला. पासदगाव येथील राधेश्वरी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी वृक्षारोपांची रोपे आणि भारताच्या संविधान उद्देशिकेची फ्रेम भेट देण्यात आली. नरवाडे आणि साळवे परिवाराने राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेरली कुष्ठधाम येथील चांदू नरवाडे यांची कन्या चि.सौ.कां. रोहिणी आणि दयफळ भोगाने (ता. परतूर) येथील अशोकराव साळवे यांचे चिरंजीव चि. विशाल यांचा शुभविवाह ५ जुलै रोजी संपन्न झाला. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
वराचे वडील अशोकराव साळवे यांच्या संकल्पनेतून हा कौतुकास्पद उपक्रम आकारास आला. विवाह सोहळ्यात पारंपरिक आहेर आणि शाल-श्रीफळ यांसारख्या औपचारिकतेला फाटा देऊन, निसर्गाप्रती आणि देशाच्या संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या अंतर्गत उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना जवळपास ४०० वृक्ष आणि संविधान उद्देशिकेची फ्रेम सप्रेम भेट देण्यात आली. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन दोन्ही परिवारांनी घेतलेला हा निर्णय इतरांसाठी आदर्श आणि मार्गदर्शक ठरणारा आहे. या सामाजिक उपक्रमाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा असून, वधू-वरांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS