मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने २९ व्या पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाचे प्रकाशन १९ नोव्हेंबर २०२५ रोजी बॅलार्ड पिअर येथील पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे प्रख्यात कवी श्री. अशोक नायगावकर यांच्या हस्ते झाले. दीप प्रज्वलनाने प्रकाशन सोहळ्याची सुरुवात झाली.
याप्रसंगी अशोक नायगावकर यांनी पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाला शुभेच्छा देऊन कामगारांचे आणि मान्यवरांचे साहित्य घेऊन हा अंक चांगला वाचनीय झाला आहे. तो आपण सर्वांनी वाचावा. कारण आजकाल मोबाईलच्या दुनियेमध्ये वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. वाचन केल्याने आपली वैचारिक पातळी वाढते.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, चांगले लोक आहेत म्हणून हे जग चालले आहे. यांत्रिकीकरणामुळे दोन हाताला काम मिळत नाही. डॉ. शांती पटेल, कॉ. एस. आर. कुलकर्णी, जॉर्ज फर्नांडिस या कामगार नेत्यांनी आयुष्यभर आपलं योगदान देऊन कामगारांचे हित साध्य केलं आहे त्यासाठी कामगारांनी संघर्ष देखील केला आहे. कामगार चळवळ दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे, ही वस्तुस्थिती असून आजकाल वृत्तपत्र क्षेत्रात कामगार सदरे देखील बंद झालेली आहे. मुंबईचा कणा असलेला कामगार आता मुंबईतून हद्दपार झाला आहे.
ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये यांनी अध्यक्षीय भाषण सांगितले की, मुंबई पोर्टमध्ये पूर्वी चाळीस हजार कामगार होते, आता साडेतीन हजार कामगार राहिले आहेत. कामगार चळवळ कमकुवत झाली आहे, हे खरे आहे. गोदी कामगारांना चांगली पगारवाढ व थकबाकी मिळाल्यामुळे सेवेतील आणि सेवानिवृत्त कामगारांनी युनियनला सढळ हस्ते देणगी देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचे मी आभार मानतो. ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आपली १०४ वर्षाची जुनी कामगार संघटना असून, कामगार अंकाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करता, याचा मला अभिमान वाटतो. मारुती विश्वासराव हे अंकाचे कार्यकारी संपादक असून पत्रकार म्हणून गोदीत घडत असलेल्या बातम्या ते सविस्तरपणे देतात. त्या बातम्या आम्ही छापतो. मारुती विश्वासराव व त्यांचे सर्व सहकारी गेली २९ वर्ष पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे संपादन करीत असल्याबद्दल त्यांचे मी कौतुक करतो.
युनियनचे आणि फेडरेशनचे जनरल व सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोदी कामगारांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे कामगारांना व पेन्शर्सना चांगली पगारवाढ मिळाली. वेतनकराराची थकबाकी मिळाल्यामुळे कामगारांना गणपती व दिवाळी चांगली गेली. प्रास्ताविक भाषण कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय युनियनचे सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन सतिश घाडी यांनी केले तर आभार सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले. प्रकाशन सोहळ्यात युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, मुंबई पोर्ट प्राधिकरणचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे सेवानिवृत्त अधिकारी गिरीराज राठोड यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर ज्ञानेश्वर वाडेकर, महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त संचालक आणि न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, मुंबई टांकसाळ मजदुर सभेचे संजय सावंत, गणित तज्ञ व राष्ट्रपती पुरस्कार विजेते नारायण गव्हाणे, नुसीचे सलीम झगडे, बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, आदी मान्यवर उपस्थित होते. , शीला भगत, योगिनी दुराफे, सुजाता दळवी यांनी समूहगीत म्हंटले. याप्रसंगी मान्यवर व लेखकांना " पोर्ट ट्रस्ट कामगार अंक व पुष्पगुच्छ " देऊन सन्मान करण्यात आला, न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे नियमित लेखक आणि कामगारांगाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांची नुकतीच सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल न्यूज स्टोरी परिवारातर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रकाशन सोहळ्याला युनियनचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, पोर्ट ट्रस्टचे कामगार, सेवानिवृत्त कामगार, खाजगी कामगार, लेखक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

addComments
टिप्पणी पोस्ट करा