मुंबई पोर्ट ट्रस्टच्या राजस नगर (पूर्वीचे जकेरिया बंदर) वसाहतीमध्ये ४० ते ५० वर्षांपूर्वी अगदी लहानपणी एकत्र राहणाऱ्या , मित्र-मैत्रिणींचा सहावा स्नेह संम्मेलन मेळावा, कॉटनग्रीन येथील त्याच वसाहतीत, १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा झाला. लहानपणीचे जवळपास ९० ते १०० सवंगडी यावेळेस एकत्र जमले होते. काहीजण तर सहकुटुंब आले होते. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे चीफ इंजिनिअर अविनाश तांबेवाघ, उद्योगपती अविनाश कांबळे व कोळपे बंधू, पर्शियाना बिर्याणीच्या राणी मेजारी, हॅपी फिट टूरचे अरविंद जागडे, निर्माता दिग्दर्शक विजय सोमा सावंत,पोलीस उपनिरीक्षक अतुल जांभळे, दत्ता नामदास, गायक प्रशांत पाटील, बांधकाम व्यावसायिक आसिफ खान, ज्वेलर्स विनोद मालंडकर, डॉ . कल्पना वारंग, प्रमोद खानोलकर इत्यादींचा समावेश होता. सध्या हे सर्व मित्र-मैत्रिणी ५० ते ७० या वर्षांचे आहेत. सात वर्षांपूर्वी लहानपणीच्या या सर्व मित्र-मैत्रिणींनी एकमेकांशी संपर्क साधून, लहानपणी राहत असलेल्या ठिकाणीच एकत्र भेटण्याचे ठरवले व या स्नेहसंमेलनास सुरुवात झाली. कोविड संसर्गाचा मधला दोन वर्षांचा काळ सोडला तर, हा सोहळा सलग सुरू आहे. गाणी, लहानपणीचे तेच खेळ, तीच जागा, तीच धमाल, तीच मस्ती, तोच पोरकटपणा, तीच लुटूपुटूची भांडणे, तीच टोपण नावे या सर्व गोष्टींनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत, सोबत गल्ली क्रिकेट, संगीत खुर्ची, बटाटा शर्यत, पुरुष व महिला मॅरेथॉन स्पर्धा, गायन स्पर्धा असे विविध खेळ घेऊन,पुन्हा एकदा लहानपण अनुभवत, या दिवसाचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून बाबा सेवानिवृत्त झाल्यामुळे सर्वांनाच ती वसाहत सोडावी लागली होती. त्यामुळे लहानपणाचे अनमोल सोबती असलेल्या आपल्या घरांना व लहानपणी बागडलेल्या प्रत्येक जागेला भेट देऊन, प्रत्येक जण आपल्या त्या अनमोल आठवणींना उजाळा देत होता. मुंबई पोर्ट प्रशासनाचे सहकार्य लाभलेल्या, सकाळच्या अल्पोपहारापासून ते संध्याकाळचा एकमेकांचा भावनिक निरोप घेईपर्यंतच्या या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आयोजन करण्यासाठी विजय सोमा सावंत, प्रशांत पाटील, निसार पठाण, अशोक ढोके, प्रमोद धिल्लन,असिफ खान, शकील खान, सुहास सरफरे, अभय मेजारी इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. संध्याकाळी कार्यक्रमाच्या शेवटी सन्मान सोहळा व दिवसभराच्या खेळांचा बक्षीस समारंभ, मुंबई पोर्ट ट्रस्टचे वेल्फेअर सुप्रीटेंडंट तानाजी गायकवाड, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी मारुती विश्वासराव यांना पत्रकारीतेतील उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी तानाजी गायकवाड, मारुती विश्वासराव, अविनाश तांबेवाघ, डॉ. कल्पना वारंग, विजय सोमा सावंत इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छापर भाषणे केली. पुढल्या वर्षी पुन्हा नक्की भेटूया अशा आणा भाका घेत, अतिशय जड व भावनिक अंतःकरणाने परंतु, प्रफुल्लित मनाने, आठवणींची शिदोरी सोबत घेऊन, सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा