नांदेड दि. १७
स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवार , दि. २० जानेवारी २०२५ रोजी बरबडा येथे सातवे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ सौ. मथुताई सावंत, संमेलनाचे उद्घाटक म्हणून राज्याचे सहकारमंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, मा. आ. विक्रम काळे, मा. आ. राजेश पवार उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध लेखिका डाॅ. सौ. मथुताई सावंत ह्या नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये मराठीच्या प्रोफेसर आहेत.
मराठवाड्यातील पहिल्या ग्रामीण कादंबरीकार अशी डॉ. सौ. सावंत यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. त्यांची वीस पुस्तके प्रकाशित झाली असून 'राहू केतू' आणि 'जिनगानी' ह्या दोन कादंब-या,
'पाण्यातील पायवाट' , 'तिची वाटच वेगळी' , 'निवडुंगाची फुले' आणि 'पाणबळी' हे ४ कथासंग्रह , 'लगीनघाई? मुळीच नाही!' आणि 'नवरसांची नवलाई' ही दोन नाटके, 'सर्जनाचा शोध', 'समाज, साहित्य आणि संस्कृती', 'साहित्यसौरभ', 'अधोरेखित' आणि 'अक्षरवाटा' हे ५ समीक्षालेखसंग्रह त्यांच्या नावावर जमा आहेत. याशिवाय त्यांनी बालकुमार वाचकांसाठी सावित्रीबाई फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित संस्कारक्षम चरित्रे लिहिली आहेत.
'राहू केतू', 'तिची वाटच वेगळी' आणि 'निवडुंगाची फुलं' या साहित्यकृतींना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. समग्र साहित्यसेवेसाठी नांदेड जि. प.चा नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि सामाजिक कार्यासाठी सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे. तसेच विविध साहित्यसंस्थांचे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविले आहे. स्त्रीजीवनाचे अंतरंग आणि तिचे उपेक्षित भावविश्व यांचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी कसदार लेखन केले आहे. हे लेखन स्त्रीशक्तीसाठी प्रेरणादायी व मोलाचे ठरले आहे.
स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी यांनी नांदेड येथे मराठवाड्यात पहिले महिला महाविद्यालय स्थापन करून स्त्रीशिक्षणात मोलाचे योगदान दिले आहे. कुटुंब, समाज, संस्कृती व देशाच्या उभारणीत स्त्रीशक्ती मोलाची भूमिका बजावत असते, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी विपुल कार्य केले. ती चळवळ पुढे चालू राहावी, स्त्रीशक्ती सबल आणि सक्षम व्हावी, या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी साहित्य संमेलनाचे नियोजन केले आहे. त्यासाठी मराठीतील ख्यातनाम लेखिका डॉ. सौ. मथुताई सावंत यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
डॉ. जगदीश कदम, ग. पि. मनूरकर, प्रा. नागनाथ पाटील, प्रा. नारायण शिंदे, प्रा. इंद्रजीत भालेराव आणि कथाकार राजेंद्र गहाळ इ. मान्यवरांनी यापूर्वी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
या साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला सकाळी ग्रंथदिंडी निघेल. त्यात पारंपरिक वेशभूषा, भजने, लेझीम व ग्रामीण देखाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कवयित्री सुचिता खल्लाळ यांची मुलाखत प्रा. पृथ्वीराज तौर आणि प्रा. व्यंकटी पावडे हे घेणार आहेत.
तिसरे सत्र कविसंमेलनाचे असेल. या सत्राचे अध्यक्ष कवयित्री बालिका बरगळ आहेत. कविसंमेलनात उषाताई ठाकूर, रुपाली वागरे, अनिता जाधव, रुचिरा बेटकर, अलका मुगटकर, रोहिणी पांडे, अंजली कानिंदे, ज्योती करवंदे इ. कवयित्री सहभागी होणार आहेत.
या वेळी अंजूराव सूर्यवंशी कौसडीकर यांच्या भारुडाचा रंगतदार कार्यक्रम होणार आहे.
तसेच शाळेतील विद्यार्थी गायत्री वडपत्रे, उजमा शेख , किरण हाणमंते व जात्यावरील ओव्या, पिंगळागीत सादर करणार आहेत. संमेलनाला साहित्यिक डॉ. जगदीश कदम, डॉ. सुरेश सावंत, रामभाऊ शेवडीकर , राजेंद्र गहाळ व प्रा. नारायण शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनाच्या सत्रात संमेलन अध्यक्षा डॉ. सौ. मथुताई सावंत यांचे अध्यक्षीय भाषण होईल. दुसऱ्या सत्रात प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम असेल. तिसरे सत्र निमंत्रित कवयित्रींचे कविसंमेलन, तसेच लोकसाहित्यातील भारूड, गवळण व जात्यावरच्या ओव्या असा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम असेल, असे संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, संस्थेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी, व्ही. टी. सुरेवाड , शिवाजीराव धर्माधिकारी, इरन्ना कंडापल्ले, सौ. छायाताई दिलीपराव धर्माधिकारी, जगदीशराव धर्माधिकारी, तसेच ज. ने. वि. बरबडाचे प्राचार्य तथा सहसचिव सुदर्शनराव धर्माधिकारी आणि संयोजन समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा