अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या 'रुटीन'चे गुणवत्तेच्या 'प्रोटीन'मध्ये रुपांतर करा -डॉ. सुरेश सावंत


नांदेड/प्रतिनिधी..

आज आपण सर्वजण प्रचंड सामाजिक अस्वास्थतेच्या कालखंडातून जात आहोत. त्यामुळे समाजामध्ये कमालीची उदासीनता आलेली दिसून येत आहे. ही उदासीनता, ह्या 'रूटीन'चे रूपांतर 'प्रोटीन'मध्ये करावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांनी केले.

अक्षर परिवार या नावाने सुपरिचित असलेल्या वाजेगाव बीटमध्ये सर्जनशील विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी जागतिक दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. गुरुजींनी ही उदासीनता आपल्यात येऊ न देता, या रूटीनचे गुणवत्तेच्या प्रोटीनमध्ये रूपांतर करून विद्यार्थ्यांसमोर जायला हवं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर आपल्या स्वतःच्या लेकरांप्रमाणे प्रेम करावे. त्यांच्या श्वासाची लय सहवासाने समजून घेत त्यांचे शिकणे आनंददायी बनवावे. मुलांना स्वयंप्रेरणेने शिकण्यासाठी वातावरण निर्माण करून चांगला माणूस बनविणारे शिक्षणच खरे शिक्षण असते. शिक्षकाने आपण ज्या वर्गात पाऊल ठेवतो, त्या वर्गाचे रूपांतर स्वर्गात करायला हवे. विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या, सामाजिक दडपणाच्या कुरुक्षेत्राकडून गुरुक्षेत्राकडे आणण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांनी पेलायला हवी. अक्षर परिवारातील सर्वच शिक्षक परिश्रम घेताना दिसून येतात. या परिवाराचा अक्षरयात्री व्हायला मला आवडेल. या उपक्रमांत सातत्य ठेवा असे मोलाचे मार्गदर्शन प्रसिध्द साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी केले. 

नावीन्यपूर्ण उपक्रमांचे माहेरघर असलेल्या वाजेगाव बीटमध्ये नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. या वर्षी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी जागतिक दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी बीटमधील सर्व शिक्षकांची संकल्प कार्यशाळा आयोजित केली. याच कार्यक्रमात मेघा पोलावार, रामराव देशमुख आणि रुपेश गाडेवाड या उपक्रमशील शिक्षकांना शिक्षकभूषण पुरस्काराने डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या वेळी लातूर विभागाचे सहायक शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय मठपती , प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे , स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिगंबर क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा समन्वयक डॉ. दादाराव शिरसाठ हेदेखील उपस्थित होते. शिक्षक संघटनांची मध्यवर्ती समन्वय समिती नांदेड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्तप्रसाद पांडागळे यांचा सत्कार करण्यात आला.

 दिगंबर क्षीरसागर यांनी आधुनिक काळातील 'स्क्रीन टच' गुरुजींनी विद्यार्थी संवेदनांच्या स्पर्शाला पारखे न होता प्रेमळ गुरुजी बनून राहण्याची धडपड सुरूच ठेवावी, हा मोलाचा सल्ला दिला. शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी आजच्या स्पर्धेच्या काळात येणाऱ्या आव्हानांना स्वीकारून मार्गस्थ होण्याचे सांगत परीक्षा पे चर्चामध्ये जास्तीत जास्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले . सहायक शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांनी शिक्षणाबरोबर संस्कार देणारे आणि उद्याचे संस्कारक्षम नागरिक तयार करण्याचे केंद्र म्हणजे जिल्हा परिषद शाळा आहेत, अशा शब्दात जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षकांचा गौरव केला. या वेळी काळाची पावले ओळखणारा, कायम माणसांच्या गराड्यात आढळून येणारा संवेदनशील माणूस या शब्दांत विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांचे त्यांच्या विद्यार्थी समर्पित वृत्तीबद्दल कौतुक केले.

या वेळी राष्ट्रमाता शालेय ग्रंथालयाचे उद्घाटन डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सावंत यांनी या ग्रंथालयास पाच हजारांची ग्रंथसंपदा देण्याची घोषणा केली. प्रास्ताविकात व्यंकटेश चौधरी यांनी अक्षर परिवारात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रकारच्या बुद्धिमत्ता विकसित करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले. रामराव देशमुख आणि डॉ. अर्चना सावंत यांची मनोगते झाली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अक्षय ढोके यांनी केले. आभारप्रदर्शन केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम गाडेकर आणि सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या