प्रत्येक बालकाचा प्रथम गुरू त्याची आई असते. बालपणापासून ते शाळेत दाखल होईपर्यंत ते आपल्या आईकडून बऱ्याचशा गोष्टी शिकते. आई सुद्धा तिच्या लेकरांचा प्रत्येक हट्ट पुरवत संस्काराचे धडे देत असते. तिचे लहान बाळ रडताना नेमकं कारण शोधून उपाययोजना करणं आई एवढं जगात दुसरं कोणीही करू शकत नाही. म्हणून ज्यावेळी बालक पहिल्या वर्गात प्रवेश घेईल तेव्हापासून प्रत्येक शिक्षकाने बालकांची आई होऊन विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न व देशाचा सशक्त नागरिक बनविणे काळाची गरज आहे. असे मत शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांनी जि. प. प्रा. शाळा खुपसरवाडी येथे आयोजित शिक्षण परिषदेस मार्गदर्शन करताना व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, संपत्ती पेक्षा संतती महत्त्वाची आहे. म्हणून प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत दररोज पाठवून भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.तसेच पाल्य शाळेतून घरी आल्यानंतर नियमित अभ्यास करून घ्यावा. उद्याचा दर्जेदार नागरिक निर्माण करण्यासाठी संपत्तीपेक्षा संततीकडे अधिकचे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले .
29 सप्टेंबर रोजी जि. प. प्रा. शाळा खुपसरवाडी येथे धनगरवाडी केंद्राची चौथी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली.सदरील शिक्षण परिषदेस शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महाजन मंडले, तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा सरपंच प्रतिनिधी महमूद शेख, ग्रामपंचायत सदस्य अनसाजी भोसले, प्रभारी केंद्रप्रमुख भगवान सोनटक्के, केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील शिक्षण परिषदेत विद्या प्रवेश, आजादी का अमृत महोत्सव, रीड टू मी ॲप, विद्यांजली पोर्टल, एकात्मिक व द्विभाषिक पुस्तके, माता पालक गट इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली. पुरोगामी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी केंद्रातील धडाडीचे व्यक्तिमत्व जेडी कदम यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल केंद्रातील सर्व शिक्षकातर्फे शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांनी सत्कार केला तसेच शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांचे चिरंजीव लेखक नचिकेत मेकाले यांनी नीट परीक्षेत 645 गुण घेतल्याबद्दल खुपसरवाडी शाळेतर्फे व केंद्रातर्फे इथोचित सन्मान करण्यात आला व केंद्रातील सर्व शिक्षिकेंचा खुपसरवाडी शाळेतर्फे दुर्गा महोत्सवानिमित्त शिक्षण क्षेत्रात भरीव काम करीत असल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला.
सदरील शिक्षण परिषदेत बसवेश्वर मरशिवणे, डी. के. केंद्रे, वृषाली देशपांडे, शिवानंद द्रोणाचार्य यांनी साधन व्यक्ती म्हणून काम केले. कार्यक्रमाची प्रस्ताविक तंत्रस्नेही मुख्याध्यापिका कल्पना मुसांडे यांनी मांडले तर, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे. डी. कदम यांनी उपस्थितांचे शाळेतर्फे आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करून रामचंद्र बस्वदे यांनी उपस्थितांची मने जिंकली.
सदरील शिक्षण परिषदेतील नियोजन अतिशय उत्कृष्ट असल्याची भावना सर्व शिक्षक व अधिकारी यांनी व्यक्त करून शाळेचे विशेष कौतुक केले.


COMMENTS