नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने महावितरणचे मंडल कार्यालय नांदेडला होणार आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी (ता. 26 जानेवारी) दुपारी चव्हाण यांच्या हस्ते स्नेहनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त कार्यालय नांदेदला नेले होते. त्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले होते.
महावितरणचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता पी. आर. भारती यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे यापुढे राज्यात पाच विद्युत मंडळ कार्यालये असतील.पुणे व नागपूरला हे कार्यालय पूर्वीपासून कार्यरत होते.
आता मुंबई, औरंगाबाद व नांदेड येथे ही कार्यालये नव्याने सुरू होतील. विद्युत मंडळ कार्यालयात अधीक्षक अभियंत्यासह 17 अभियंते व कर्मचारी असतील. या शिवाय विद्युत शाखेचे विभागीय कार्यालय देखील नांदेडला राहणार आहे. या कार्यालयात कार्यकारी अभियंत्यासह 15 कर्मचारी कार्यरत असतील.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नांदेडला 32 अधिकारी व कर्मचारी मिळणार असून, ही दोन्ही कार्यालये नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारातच सुरू होत आहेत. त्यामुळे विद्युत परवानग्या आदी सर्व कामे नांदेडलाच शक्य होणार असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे औरंगाबाद शहरालाही मोठी भेट मिळाली आहे. औरंगाबादचे राज्याच्या नकाशातील मध्यवर्ती स्थान पाहता याठिकाणी दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे राज्याचे मुख्यालय सुरू होणार आहे. या मुख्यालयात अधीक्षक अभियंता दर्जाचे प्रमुख कार्यरत असतील. या मंडळाकडे प्रामुख्याने तांत्रिक लेख्यांची तपासणी, भांडार साठा पडताळणी, आकस्मिक कार्यस्थळ तपासणी, विद्युत विषयक कामांच्या तक्रारीविषयक चौकशी व तपासणी आदी जबाबदारी असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या ता. 29 ऑक्टोबर 2020 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेचे बळकटीकरण करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे. मागील काळामध्ये ही शाखा गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या शाखेची उपयुक्तता व त्यांच्याकडील कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन या शाखेचे बळकटीकरण केले आहे. त्यामुळे त्याचा भविष्यातील विकासकामांसाठी फायदा होणार असल्याची माहिती भारती यांनी दिली आहे.

COMMENTS