नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
अपहाराच्या प्रकरणात नायगांव, कुंटूर व कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला आणि मागील दिड वर्षांपासून फरार असलेल्या भामटा ग्रामसेवक शेषराव कौसल्ये याच्या कुंटूर पोलीसांनी मुसक्या अवळल्या आहेत. दिनांक ५ डिसेंबर रोजी मोठ्या शिताफीने कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अतिशय वादग्रस्त कारकीर्द असलेला ग्रामसेवक शेषेराव कौसल्ये हा बनावटगीरी करण्यातही तरबेज आहे. नायगांव तालुक्यातील मोकासदरा येथे असतांना १२ लाखाच्या शौचालय अनुदानावर डल्ला मारला होता. एवढेच नव्हे तर तत्कालीन गटविकास अधिकारी उमाकांत रहाटीकर यांची बोगस सही करुन गडगा येथील बँकेतून रक्कम उचलण्याचाही प्रयत्न केला होता. पण शाखा व्यवस्थापकाचा सतर्कतेमुळे त्याचा त्यावेळी प्रयत्न फसला मात्र मोकासदरा येथील स्वच्छ भारत मिशन योजनेतील रक्कम ऊचलून घेतल्या प्रकरणी नायगांव पोलीस ठाण्यात कौसल्ये याच्यासह अन्य तिघांच्या विरोधात नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. एवढेच नव्हे तर बिलोली तालुक्यातील डौर येथेही १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील अपहार प्रकरणी कुंडलवाडी येथील पोलीस ठाण्यात तर बिलोली तालुक्यातील दुगाव येथेही १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करतातच जवळपास ७ लाखाचा अपहार केल्या प्रकरणी बिलोलीचे तत्कालीन गटविकास अधिकारी उमाकांत रहाटीकर यांच्याच तक्रारीवरुन कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
नायगावसह कुंटूर व कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी ग्रामसेवक शेषराव कौसल्ये हा मागील दिड वर्षांपासून तीनही पोलीस ठाणेदारांना चकमा देत फरार होता. तीनही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अनेकवेळा त्याच्या घरी व गावात जावून शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो पोलीसांना सापडला नाही. दिनांक ५ डिसेंबर २०२० रोजी तो उमरा ता.लोहा या आपल्या गावी येणार असल्याची माहिती कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसाह पोलीस उप निरिक्षक दिनेश येवले, जमादार शेख अब्दूल बारी, पोलीस कर्मचारी उध्दव कदम, यांनी उमरा येरे कौसल्ये यास पकडण्यासाठी सापळा रचिला होता.दिनांक ५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान तो पोलीसाच्या सापळ्यात अडकला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुंटूर पोलीस करत आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणी नायगांव पोलिसांनी कसलाच तपास केला नाही की आरोपी सापडण्यासाठी कधीच शोध मोहीम राबवली नाही मात्र कुंटूर पोलिसांच्या प्रयत्नाला यश आले आहे .

COMMENTS