शेतक-यांचा पुळका असणा-यांनी साखर कारखाने का विकले?
नांदेड : केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषि विधेयकाला विरोध करत शेतक-यांचा कोरडा पुळका दाखविणा-यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन सहकारी साखर कारखाने का विकले, असा सवाल भाजपाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांनी भाजपाच्या केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप करत शेतक-यांची दिशाभूल करु नये, अशा कानपिचक्याही खा.चिखलीकर यांनी दिल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील साखर सम्राट म्हणून आपणच या जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे तारणहार आहोत, असा देखावा निर्माण करत अशोक चव्हण यांनी भाऊराव चव्हाण साखर कारखाना येळेगाव-देगाव च्या अधिपत्याखाली वाघलवाडा येथील सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी विकत घेतला होता. शंकर सहकारी साखर कारखाना युनिट क्र.3 (भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्र.3) आणि हदगाव तालुक्यातील हडसणी हुत्माता जयंतवराव पाटील सहकारी साखर कारखाना युनिट क्र.4 (भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्र.4) अशा पध्दतीने हे दोन्ही कारखाने चालविण्यासाठी घेतले होते. जोपर्यंत या कारखान्यातून चव्हाणांना नफा मिळाला तोपर्यंतच त्यांनी हे कारखाने चालविले. जिथे नफा नसतो तिथे चव्हाण काम करत नाहीत यानुसार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन्ही कारखाने विक्रीस काढले. ज्यावेळी ते कारखाने त्यांनी विकत घेतले होते. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना केवळ आपणच न्याय देणार अशा आरोळ्या ठोकल्या होत्या. आता दोन्ही कारखाने विकून चव्हाणांनी ऊस उत्पादकांना वा-यावर सोडले आहे. ऐवढेच नाही तर त्या कारखान्यातील कामगार, कर्मचारी यांनाही देशोधडीला लावले आहे. त्यामुळे चव्हाणांना शेतक-यांच्या हिताची काळजी नाही तर कोरडा पुळका आहे, अशी कोपरखळीही खा.चिखलीकर यांनी लगावली आहे.
काँग्रेसच्यावतीने शेतकरी आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी काढण्यात आलेल्या बैलगाडी लाँगमार्चमध्ये खा.चिखलीकर यांच्यावर जी टिका करण्यात आली ती टिका निव्वळ अज्ञानातून करण्यात आली आहे. वास्तविक नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांच्या भेटीगाठी घेवून खा.चिखलीकर यांनी शेतक-यांना धीर दिला. त्यावेळी पालकमंत्री कुठे होते? मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने बेजार झाला असतांना राज्यातील त्रिमुर्ती सरकार शेतक-यांना नुकसान भरपाई का देत नाही? अशोक चव्हाण हे मंत्री मंडळातील जबाबदार मंत्री असतांना त्यांनी विधानसभा मराठवाड्यातील शेतक-यांना मावेजा मिळवून देण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत असा सवाल उपस्थित करतांना खा.चिखलीकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे त्वरीत करुन मदतीची मागणी केली होती. भारतीय जनता पार्टी सदैव शेतक-यांच्या हितासाठी काम करत आहे. शेतक-यांचे होणारे हित काँग्रेसला बघवत नाही. काँग्रेसकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे काँग्रेसने बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा शेतक-यांच्या हिताकडे लक्ष द्यावे आणि कोरडा पुळका सोडून द्यावा, असेही खा.प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.
क्लब, मटके कोणाचे हे जनतेला माहीत आहे
नांदेड जिल्ह्यातील क्लब आणि मटके हे कोणाचे आहेत हे अगोदर अशोक चव्हाणांनी तपासून पहावेत. त्यांच्या सांनिध्यात वाढणा-या चेले-चपाट्याचे क्लब व मटका सर्वत्र सुरु आहे. जमिनी हडप करणे, अवैध धंदे चालविणे हे त्यांच्याच चेले-चपाट्याची प्रवृत्ती आहे. असे अवैध धंदे करण्याची आम्हाला गरज नाही. लोकसेवा हा आम्ही उचलेला वसा आहे. त्यामुळे जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. अशोक चव्हाणांनी कोठल्याही थरारला जावून कोणत्याही बिनबुडाचे आरोप केले तरी जनतेला खरे काय माहित आहे, असेही खा.चिखलीकर म्हणाले.
COMMENTS