*पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ* *कापूस वेचणीस आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाने झोडपले* *पंचनामे करत तत्काळ आर्थिक मदत देण्याची सर्वस्तरातून मागणी*


*सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी*


मागील पंधरा दिवसापूर्वी आलेल्या पावसाने सोयाबीन पीक हाती येऊ दिले नसल्याने शेतकऱ्यांची मदार उरल्या-सुरल्या कापसावर होती मात्र शनिवार,रविवार रोजी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे आणली आहेत.त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या नशिबी संकटाचा सामना करावा लागत असून पेरणी हंगामात दुबार पेरणी आणि तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.त्यानंतर मूग काढणीवेळी आलेल्या पावसाने पुन्हा संकट उभे केले होते.त्यावर मात करत शेतकऱ्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केला असतानाच सोयाबीन काढणी हंगामात सलग दहा दिवस सुरू असणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब ताजी असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने कापसावर मदार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणली आहेत.होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांत त्रेधातिरपीट निर्माण झाली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे.मुगकाढणी वेळीही पावसाने असाच हाहाकार माजवला होता.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मुग काळे पडल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले होते.यामुळे या मुगास कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत.ते संकट कायम सोयाबीन पिकावरील संकट आणि आता कापूस वेचणीत आलेल्या जोरदार पावसाने आर्थिक संकट निर्माण केले असल्याचा प्रकार दिसत असून शेतकऱ्यांना तत्काळ भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.


*शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा:-सुधीर बिंदू*


प्रशासनातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे दुःख अजून कळल्याचे दिसत नाही.मोठ्या हिमतीने पिकवलेले पीक हातून जात आहे.हे पहाताना काय यातना सहन कराव्या लागतात ते शेतकरीच जाणतो मागील पावसातही एका दिवसात पंचनामे करण्याचे दिलेले आदेश म्हणजे आदेश देऊन शेतकऱ्यांना आशेला लावत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करत या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना धीर द्यावा अन्यथा येणाऱ्या संकटावर मात करताना शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्यासारखा निर्णय घेतील अशी भीती शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू यांनी व्यक्त केली.त्याचबरोबर त्यांनी दिवसाच्या पीक पंचनाम्याचे आदेश काढणे म्हणजे शेतकऱ्यांना तो आदेश काढून आशेला लावल्यासारखे दिसते.आज तत्काळ पंचनामे करुन सरसगट मदत मिळणे गरजेचे आहे.त्याकरिता शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत करावी.त्याचबरोबर अशा येणाऱ्या संकटावर मात करताना शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे.त्यामुळे भविष्यात आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नसून शेतकऱ्यांच्या मन परिवर्तनासाठीही शासनाने पावले उचलली पाहिजेत असे मतही बिंदू यांनी व्यक्त केले.


टिप्पण्या