किनवट, दि. 11 ऑगस्ट 2026 :
पंचायत समिती किनवट येथे शेतकरी संघटनेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय योजनांशी संबंधित अडचणी व तक्रारी सोडविण्यासाठी सुरू असलेल्या ‘मदत कक्ष’ उपक्रमाला आज 10वा आठवडा पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर मदत कक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्राप्त होत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पंचायत समिती किनवटच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार, दि. 16 जून 2026 रोजी मूळ निवेदन, दि. 28 जुलै रोजी दुसरे स्मरणपत्र आणि दि. 4 ऑगस्ट रोजी तिसरे स्मरणपत्र सादर करण्यात आले. मात्र, या निवेदनांवर अद्याप कोणतेही सविस्तर लेखी उत्तर किंवा समाधानकारक कार्यवाही प्राप्त झालेली नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
मदत कक्षामध्ये घरकुल, शबरी माता, रमाई माता, रोजगार हमी, जनावरांचे गोठे, फळबाग, कृषी, महसूल, आदिवासी विभाग तसेच पंचायत समितीशी संबंधित विविध योजनांबाबत नागरिक मोठ्या संख्येने तक्रारी घेऊन येत असल्याचे संघटनेने सांगितले.
तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
पंचायत समितीतील तक्रारी, कार्यालयीन दिरंगाई आणि नागरिकांच्या अडचणींची जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांकडून विलंबाबाबत लेखी स्पष्टीकरण मागवावे आणि दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच घरकुल, शबरी माता, रमाई माता, रोजगार हमी, जनावरांचे गोठे, फळबाग आदी योजनांमधील कामांचे विशेष तपासणी व आवश्यकतेनुसार सामाजिक लेखापरीक्षण करण्यात यावे, प्रत्येक तक्रारीसाठी कालमर्यादा निश्चित करावी आणि तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल संबंधित नागरिकांना द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
‘भ्रष्टाचारी BDO ची हकालपट्टी करा’
मदत कक्षातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने “भ्रष्टाचारी BDO ची हकालपट्टी करा, पंचायत समिती भ्रष्टाचारमुक्त करा!” अशी भूमिका मांडली आहे. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन तथ्य समोर यावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी, अशी संघटनेची भूमिका असल्याचे रमेश कदम पाटील यांनी स्पष्ट केले.
“शेतकरी संघटना प्रशासनाच्या विरोधात नसून भ्रष्टाचार, दिरंगाई आणि अपारदर्शक कारभाराच्या विरोधात आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ सन्मानाने मिळावा आणि पंचायत समितीमध्ये पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन निर्माण व्हावे, हाच मदत कक्षाचा उद्देश आहे,” असे रमेश कदम पाटील यांनी सांगितले.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपविभागीय अधिकारी किनवट, तहसीलदार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
— रमेश कदम पाटील
नांदेड जिल्हाध्यक्ष (युवा आघाडी), शेतकरी संघटना

COMMENTS