एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरू झालेला प्रवास, अपार कष्ट, प्रामाणिकपणा आणि ध्येयावर अढळ विश्वास यांच्या बळावर यशाच्या शिखरावर पोहोचलेला – असा प्रेरणादायी जीवनप्रवास म्हणजे गंगाप्रसाद तोष्णीवाल. नांदेडच्या मातीत जन्मलेले हे व्यक्तिमत्त्व आज संपूर्ण शहरासाठी अभिमानाचे प्रतीक ठरले आहे. लहानशा सुरुवातीपासून मोठ्या उद्योगसमूहापर्यंतचा त्यांचा प्रवास केवळ आर्थिक प्रगतीचा नसून, तो मूल्यांचा, नात्यांचा आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीचा आहे.
अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये ११,०००, स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र असे आहे. गंगाप्रसाद तोष्णीवाल यांनी
१९८८ साली जीव्हीसी ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात मर्यादित साधनसंपत्ती, अनेक अडचणी आणि अनिश्चिततेच्या वातावरणात त्यांनी पाऊल टाकले; पण हार मानण्याऐवजी त्यांनी प्रत्येक अडचणीला संधी मानले. “कामात प्रामाणिकपणा आणि माणसांशी नात्यांमध्ये विश्वास” – हा मंत्र घेऊन त्यांनी वाटचाल सुरू ठेवली. आज जीव्हीसी ग्रुप हा रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल्स आणि कृषी क्षेत्रात भक्कमपणे उभा असलेला विश्वासार्ह उद्योगसमूह म्हणून ओळखला जातो.
नांदेडच्या बदलत्या शहरी रूपात त्यांचा ठसा स्पष्टपणे दिसतो. दर्जेदार निवासी प्रकल्प, आधुनिक वसाहती, सुरक्षित आणि सुंदर घरांचे स्वप्न साकार करणारी कामगिरी – यामुळे असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य आणि समाधान आले. केवळ इमारती उभ्या करणे हेच त्यांचे ध्येय नव्हते; तर “माणसांचे घर” घडवणे, त्यांच्या आयुष्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हेच त्यांच्या कार्याचे खरे मर्म होते.
व्यवसायाच्या पलीकडे पाहणारे नेतृत्व म्हणूनही गंगाप्रसाद तोष्णीवाल ओळखले जातात. समाज हीच आपली खरी ओळख आहे, या भावनेतून त्यांनी आरोग्य, शिक्षण, सेवा, व्यापारी संघटना आणि सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. लायन्स क्लब, क्रेडाई, व्यापारी महासंघ अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी जबाबदारीची पदे भूषवत समाजासाठी भरीव योगदान दिले. गरजूंसाठी मदतीचा हात, युवकांना मार्गदर्शन, शहराच्या प्रगतीसाठी पुढाकार – हे त्यांच्या स्वभावाचे स्थायी रूप बनले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत लोकमत बिझनेस एक्सलन्स, सकाळ एक्सलन्स, स्वच्छ भारत अभियान सन्मान, एफ.एम. ९४.३ मोस्ट ट्रस्टेड बिल्डर,लोकमत-महाराष्ट्र रत्न व क्रेडाई नेशनल राष्ट्रीय स्तरावरील अवार्ड फ़ॉर एक्सीलेंस २०२५ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मात्र त्यांच्या दृष्टीने खरा पुरस्कार म्हणजे नांदेडकरांचा विश्वास आणि प्रेम. शहरातील प्रत्येक सामान्य नागरिक त्यांच्या कार्याकडे आदराने पाहतो, हीच त्यांची खरी संपत्ती आहे.हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर नांदेडच्या मातीने आपल्या कर्तृत्ववान सुपुत्राला दिलेली कृतज्ञतेची मानवंदना आहे. कष्ट, मूल्ये आणि समाजभान यांचा संगम असलेला हा सन्मान संपूर्ण नांदेडसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

COMMENTS