*नव्या सरकारने शेतकरी कर्जमाफी, सोयाबीनला ६ हजार रु. भाव, लाडक्या बहिणींचे २१०० रुपये व २.५ लाख पदांची नोकरभरती तात्काळ सुरु करावी.*
*काँग्रेसची विधानसभेतील संख्या कमी झाली असली तरी हिम्मत व ताकद कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारु.*
मुंबई, दि. ५ डिसेंबर २०२४
निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुतीकडे बहुमत असतानाही सरकार स्थापन्यासाठी कसरत करावी लागली. एकनाथ शिंदे व अजित पवार यांना या सरकारमध्ये फारसे महत्व दिले जाईल असे वाटत नाही. दिल्लीत वाऱ्या करुन मंत्रीपदांची भिक मागण्याची वेळ या दोघांवर आली. मोदी शाह यांच्या मेहरबानीवर शिंदे, अजित पवार सरकारमध्ये असतील. एकनाथ शिंदे यांची तर भाजपाला आता काहीच गरज नाही त्यामुळे बहुमत मिळाल्यापासूनच शिंदे व अजित पवारांना भाजपा व मोदी शाह यांनी जागा दाखवून दिली आहे. भाजपाने पुन्हा एकदा दोन प्रादेशिक पक्षांना संपवले आहे.
भाजपाचे सरकार स्थापन झाले असून निवडणूक त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतील. शेतकरी कर्जमाफी, कृषी पंपाची विज बिल माफ, लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये, २.५ रिक्त सरकारी पदांची भरती याची तातडीने अंमलबजावणी करावी. काँग्रेस पक्षाची विधानसभेतील संख्या कमी झाली आहे परंतु हिम्मत व ताकद कायम असून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही नाना पटोले म्हणाले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा