नांदेड, दि. २४ मे २०२४:
जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरु झाल्याबद्दल या प्रकल्पाचे जनक माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले असून, पुढील पाच-सहा वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते व रेल्वेचे प्रकल्प अधिक गतीमान करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हटले आहे.
प्रस्तावित जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या निविदा प्रक्रिया सुरु झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, कनेक्टिव्हिटी हा विकासाच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा घटक असतो आणि नांदेड जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी अधिक वाढावी, यासाठी चार वर्षांपूर्वी नांदेडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे असताना जालना-नांदेड या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित प्रकल्पावर आम्ही काम सुरू केले होते. या प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून मंजुरी मिळवून घेतली व त्यानंतर ८ मार्च २०२१ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. ७ सप्टेंबर २०२१ रोजी शासननिर्णय जारी झाला व १२ नोव्हेंबर २०२१ रोजी भूसंपादनासाठी राजपत्र प्रसिद्ध झाले. आता या प्रकल्पाच्या निविदा उघडण्याचा महत्वाचा टप्पा देखील पूर्ण झाला आहे.
जालना-नांदेड नवीन द्रुतगती महामार्गामुळे मराठवाड्याच्या पूर्वेला असलेल्या परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क मिळणार असून, या तीनही जिल्ह्यातून औरंगाबाद, पुणे व मुंबईला जाण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाचा शेतकरी, व्यापारी, उद्योजक, बाहेरगावी असलेले विद्यार्थी, नोकरदार मंडळी, प्रवासी अशा सर्वच घटकांना मोठा लाभ होईल. नांदेड जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नांदेड-लातूर नवीन रेल्वे मार्ग, नांदेड-बिदर रेल्वे मार्ग, नांदेड-हैद्राबाद महामार्ग अशा अनेक प्रकल्पांचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. नांदेड जिल्हावासियांचे समर्थन आणि सहकार्याच्या बळावर पुढील पाच-सहा वर्षात जालना-नांदेड महामार्गासह नांदेड जिल्ह्यातून जाणारे अनेक महत्वाचे रस्ते व रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास आणण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असे खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा