मुंबई दि.१७: गिरणी कामगारांच्या मनगटात शक्ती किती आहे,हे आता राज्य सरकारला दाखवून द्यावे लागेल आणि इतके दिवस झाले केंद्र सरकारला संवादच कळला नसेल तर आता धडा शिकवावाच लागेल,असे उद्गार राज्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी येथे कामगारांच्या आंदोलनात बोलताना काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने, मुंबईसह महाराष्ट्रातील ज्या सहा एनटीसीच्या गिरण्या बंद आहेत. त्या कामगारांच्या अडीच तीन वर्षीपासून चाललेल्या उपासमारीवर आज आझाद मैदानावर जवळपास तीन-साडेतीनतास कामगार आणि कुटुंबियांचे आक्रोश आंदोलन छेडण्यात आले.त्यावेळी अंबादास दानवे आंदोलनकर्त्या कामगारांपुढे बोलत होते.प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी प्रास्तवीक केले.आमदार शशिकांत शिंदे यांचेही त्या वेळी भाषण झाले. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
अंबादास दानवे यांनी,केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणातून एनटीसी मिल कामगारांवर जी हलाखी ओढावली आहे, त्यावर बोलतांना सांगितले,मी कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे.मला कामगारांच्या वेदना कळतात.कामगार हाताला काम द्या असे सारखे-सारखे म्हणणार नाही.परंतु आता त्यांची रास्त भूमिका सरकारच्या कानावर घालावी लागेल.नाहीतर अखेर सर्व विरोधी पक्षांचे आमदार एकत्र येऊन सरकारला या गिरण्या चालवायला भाग पाडतील.
कामगारांच्या प्रश्नावरील संघटनेची लढाऊ भूमिका विशद करताना,अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून देशात लॉगडाऊन लागू झाले.तेव्हा पासून या पूर्ण क्षमतेने चालणा-या मुंबईसह महाराष्ट्रातील सहा गिरण्या बंदच आहेत.या प्रश्नावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाने रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने छेडली आहेत.राष्ट्रीय स्तरावरील २२ एनटीसी गिरण्यातील कामगार संघटनाना एकत्र आणण्यात यश मिळवले.परंतु वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या नाकर्तेपणातून हा प्रश्न मागे पडला आहे.
इंडिया युनायटेड मिल क्र.६ ची संपूर्ण जमीन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे.त्याच्या टी.डी.आर.पोटी सुमारे १४३५ कोटी रुपये एनटीसीला मिळणार आहेत.त्या निधीच्या विनियोगातून या गिरण्यांचे आधुनिकीकरण होऊन, त्या पूर्ववत चालू शकतील.परंतु केंद्र सरकारला त्या बाबत काहीच करायचे नाही आहे.म्हणूनच राज्य सरकारने या प्रश्नावर मध्यस्थी करावी,ही आमची मागणी आहे.
रखडलेल्या गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर सचिनभाऊ अहिर म्हणाले, सध्याचे सरकार ठोस निर्णय घेण्यात मागे पडले आहे.कामगार संघटना कृती समितीने अनेक गोष्टी लढ्यातून मिळविल्या आहेत.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते समारोपाच्या भाषणात म्हणाले, म्हणाले, कामगारांना थकीत पगार मिळावा यासाठी संघाने कामगार,औद्योगिक आणि मुंबई उच्च न्यायालयात दावे दाखल केले असता न्यायालयाने एकतर गिरण्या पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात किंवा कामगारांना पूर्ण १०० टक्के पगार देण्यात यावा,असा आदेश दिला.पण त्या आदेशाची व्यवस्थापनाने अद्याप अंमलबजावणी केलेली नाही.जो या पूर्वी कामगारांना व्यवस्थापनाद्वारे महिना अर्धा पगार देण्यात येत होता.तोही गेल्या सहा महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे. कामगारांच्या उपासमारीला पारावार उरलेला नाही,म्हणूनच या प्रश्नावर राज्य सरकारने मध्यस्थी करावी,ही आमची आग्रही मागणी आहे.
अखेर एक दिवसाचे हे आक्रोश आंदोलन एकंदरीत चांगलेच गाजले.
मुंबईतील टाटा,इंदू मि.क्र.५,पोदार, दिग्विजय,तर बाहेरील अचलपूर आणि बार्शी येथील कामगार आणि कुटुंबीय मिळून २५ ते३० हजार लोक उपासमारीचे जीवन जगत आहेत.
सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेण्यात येणार आहे.सरकारला देण्यात येणाऱ्या निवेदनात ,केंद्राशी असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेता,राज्य सरकारने यांचा उपयोग एनटीसी मिलचा प्रश्न सोडविण्यासाठी करावा,अशी आग्रहाची मागणी करण्यात आली आहे.खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,सेक्रेटरी शिवाजी काळे, सुरेश मोरे यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.
संघटनेचे उपाध्यक्ष आण्णा शिर्सेकर त्याच प्रमाणे जयप्रकाश भिलारे, प्रवीण येरुलकर,उत्तम गिते, संजय कदम, मिलींद तांबडे,भाई निकम,महाराष्ट्र इंटकचे दिवाकर दळवी,एसटी कामगार नेते श्री तिगोटे,दिक्षा गुंजाळ,संगीता राऊळ (एनसीपी),वैशाली गिरकर,जया पाटील, वैशाली माने, कामगाराची मुलगी श्रेया अरुण तेलोरे आदींनी आपल्या व्यथा मांडल्या. बार्शी येथील अनेक कामगार प्रतिनिधींनी आंदोलनात भाग घेतला. संघटनेच्या सर्वच संघटन सेक्रेटरींनी या कामी महत्त्वाचे सहकार्य केले.


COMMENTS