परभणी : अक्षरदान प्रतिष्ठान आयोजित पहिल्या 'संत तुकाराम वैश्विक कथा लेखनस्पर्धे'चा निकाल जाहीर झाला असून सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयातील शिक्षक संभाजी रोडगे यांच्या "इन्स्पेक्शन" या कथेने सर्वप्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. पुण्याचे सुभाष पारखी (स्वामी आणि महाराज) द्वितीय, तर यवतमाळच्या निशा डांगे (दगुड) तृतीय हे विजेते ठरले आहेत. सोलापूरचे हरिश्चंद्र पाटील (घटकेचा गाव) आणि पुण्याच्या डॉ. कौमुदी आमीन (दगडांच्या देशा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, १००१, ७०१ रुपयांची रोख रक्कम व पुस्तके, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन, तर सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
कथा स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध कथाकार अमृता देसर्डा यांनी केले. त्या म्हणाल्या, "राज्यातील खेड्यापाड्यातून अनेकांनी कथा स्पर्धेत भाग घेतला, हे विशेष. जगणं शहरी असो किंवा ग्रामीण, जगण्यातला संघर्ष, समस्या- त्यातले बारकावे टिपायचा अनेकांनी चांगला प्रयत्न केला. कल्पनारंजन आणि वास्तववाद या दोन्हींची मिसळण बहुतांश कथांमध्ये आढळून आली. अक्षरदान दिवाळी अंकाने एक चांगली कथा स्पर्धा आयोजित केली."
"महाराष्ट्र, गोवा, बेळगाव, बडोदा, इंदौर येथून ६३ कथाकारांनी भाग घेऊन पहिल्याच स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. विजेत्या कथा अक्षरदान दिवाळी अंकातून प्रसिद्ध होतील. नवोदितांना व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होत असल्याचे समाधान आहे," असे अक्षरदानचे संपादक मोतीराम पौळ यांनी सांगितले.
या स्पर्धेला सॅन अँड ओशन ग्रुप, संजय घोडावत पॉलिटेक्निक, एमजीएम विद्यापीठ, बोल भिडू, मुराळी, रिंगण, साकेत प्रकाशन, उचित मीडिया, सिद्धांत मीडिया, सारद मजकूर, हर्मिस प्रकाशन, थिंक पॉझिटिव्ह, सुमन ग्राफिक्स आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
...
COMMENTS