*अविलासी विलास* मित्र विलास बाबुराव सरोदे यांचा १५ जून २०२० रोजी ६१वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. प्रसार माध्यमात गेली ४० वर्षे सक्रिय राहूनही ते विडीकाडी,सिगारेट, तंबाखू, दारू अशा सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहू शकले आहेत, हे त्यांचे उदाहरण सर्वांना खूप प्रेरणादायी आहे. सेवेत असतानाच नव्हे तर ,निवृत्तीनंतर ही ते आपला वेळ,ज्ञान ,अनुभव,वेळप्रसंगी पैसा सामाजिक सेवेत व्यतीत करीत आहेत, ही मोठी प्रशंसनीय बाब आहे. १९८८ साली मी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचा अभ्यासक्रम करत असताना आम्ही वर्गमित्र होतो. पुढे मित्र झालो,राहिलो,ते आजतागायत. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनमध्ये तर ते महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या औरंगाबाद येथील कार्यालयात कार्यरत होते. नंतर मी ही माहिती महासंचालनालयाच्या सेवेत रुजू झालो. अत्यन्त निस्पृह,निगर्वी, कुणाच्याही अडीअडचणीला न सांगता धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते सतत लोकप्रिय राहिले. अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेले , स्वतःच्या हिकमतीवर सर्व शिक्षण पूर्ण केलेले सरोदे यांनी कधीही परिस्थितीला, आईवडिलांना, देवाला,दैवाला दोष दिल्याचे मी पाहिले नाही. उलट आहे,त्या परिस्थितीत आनंदाने कसे जगावे,हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. "आनंदाने जगा" या एका चळवळीचे ते कार्यकर्ते आहेत.आज परिचय करून घेऊ या, या आनंदयात्रीचा... श्री विलास सरोदे यांचा जन्म १५ जून १९५९ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे झाला. घरामध्ये पाच बहिणी व दोन भाऊ असा मोठा परिवार . त्यात घरची अत्यंत गरिबी होती. १९७२च्या दुष्काळामध्ये रस्त्यावर आई व आजीबरोबर माती काम करायला , वेळप्रसंगी जंगलातून मोळ्या आणण्यास त्यांनाजावे लागे. अशा अडीअडचणींना तोंड देत त्यांनी बी कॉम, बी जे, एम एम सी जे या पदव्या प्राप्त केल्या. मराठी स्टेनोग्राफी केल्या मुळे त्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सेवेची संधी मिळाली. ३८ वर्षाच्या सेवा कालावधीत नांदेड, जालना, लातूर आणि औरंगाबाद येथे सेवा करून ते विभागीय लेखापाल या पदावरून ३० जून २०१७ रोजी औरंगाबाद येथे सेवानिवृत्त झाले . सेवेत असताना त्यांनी शासनाच्या "लोकराज्य " खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ग्रामोद्योग मासिकासाठी,विविध वृत्तपत्रांसाठी अनेक यशकथा लिहिल्या आहेत. माझ्या शासकीय सेवेचे शेवटचे वर्ष औरंगाबाद येथे गेले. पत्नी मुंबईत नोकरीला असल्याने मी औरंगाबाद येथे एकटाच रहात असे. दिवसाचा वेळ कामांमुळे, कार्यक्रमांमुळे सहज निघून जाई. परंतु संध्याकाळ खायला उठत असे. "बसणारी " मित्र मंडळीं रोज नियमितपणे भेटत असतात. पण रोज न बसणारी मात्र क्वचितच भेटत असतात. एकटं राहणाऱ्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा अनुभव आला असेल. तर मला अशा अनेक एकट्या संध्याकाळी मित्र म्हणून सरोदे यांनी मोलाची साथ दिली आहे. हे मी कधी विसरू शकत नाही. आम्हा दोघांच्या निवृत्तीनंतर आम्ही अन्य मित्रांसोबत दक्षिण भारत यात्रा, माऊंट अबू येथील प्रजापिता ब्राह्मकुमारी येथील " विश्व शांतीसाठी माध्यमांचे योगदान", ही कार्यशाळा अन्य अनेक कार्यक्रम एकत्रपणे आनंदले आहेत. माहिती अधिकारी आणि कर्मचारी पतसंस्थेमध्ये त्यांनी पदाधिकारी म्हणून यशस्वीपणे काम केले आहे. औरंगाबाद जिल्हा पेन्शनर असोसिएशन,प्रगतिशील जेष्ठ नागरिक सेवा संघाचे ते सक्रिय सदस्य आहेत. साळी समाजात भूषणावह असलेल्या न्यू जिव्हेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोषाध्यक्षपदी ते कार्यरत आहे.
संघर्षातून यशाकडे वाटचाल केलेले सरोदे स्वभावाने शांत आहेत. बोलके पण मृदुभाषी आहेत. ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपल्यावर ऋण आहे ही उच्च कोटीची भावना ठेवून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी ते विविध प्रकारच्या माध्यमातून सेवा करीत आहे. मुंबई येथून दर महिन्याला प्रकाशित होत असलेले "स्वकुळ समाचार ", पुणे येथून दर महिन्याला प्रकाशित होत असलेले " जिव्हेश्वर समाचार " आणि इचलकरंजी येथून प्रकाशित होत असलेले " साळी समाचार " या मासिकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी वेळोवेळी काम केले आहे व सध्या देखील करीत आहे.
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाजाचे मराठी साहित्य संमेलन पुणे आणि मुंबई येथे संपन्न झाले आहे. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद आय ए एस अधिकारी तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विद्यमान महासंचालक श्री. दिलीप पांढरपट्टे साहेब यांनी भूषविले आहे. या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेसाठी मराठवाडा विभागातून संमेलनाच्या संयोजन समितीचे सदस्य या भूमिकेतून त्यांनी फार मोठी जबाबदारी स्वीकारून ती यशस्वीपणे पार पाडली आहे. याबद्दल त्यांचा साहित्य संमेलनात मोठा सत्कारही करण्यात आला होता. श्री. सरोदे यांच्या पत्नी सौ. सुनिता या बीएस्सी, बीएड,एमएड,बी जे असून बळीराम पाटील विद्यालय, औरंगाबाद येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सौ. सुनीतावहिनीना देखील समाज कार्याची खूप आवड आहे. श्री.सरोदे यांना एक मुलगा व एक मुलगी असा असा परिवार आहे. मुलगा चैतन्य हा इंजीनियर असून पुणे येथे टाटा कन्सल्टन्सी आय.टी . कंपनीमध्ये सेवारत आहे. मुलगी नम्रता ही इंजिनिअरिंगच्या सर्व शाखांमध्ये प्रथम श्रेणीत एमटेक झाली असून ती सुवर्ण पदक विजेती आहे. या यशाबद्दल तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांच्याहस्ते तिचा सत्कार करण्यात आला आहे. आता ती अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. जातीपातीचा,भाषेचा, प्रांताचा असा संकुचित विचार न करता सरोदे कुटुंबियांनी अत्यन्त थाटात तिचा विवाह तिच्या मनाप्रमाणे तिचे वर्गमित्र, आंध्रप्रदेशातील श्री. राजीव प्रसाद अटलुरी,एन आय टी एम टेक इंजिनिअर तथा स्टेट बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट मॅनेजर यांच्याशी थाटामाटात करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या या विवाहाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, माहिती खात्याचे आजी,माजी अधिकारी, सहकारी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.विवाह सोहळा नव्हे तर एका स्नेह सम्मेलनाचं सर्व आनंदी वातावरण होतं. यावरून सरोदे यांची लोकप्रियता,जनसंपर्क दिसून आला.
सरोदे यांनी हॅप्पी थॉट्स कोर्स केला आहे. त्यामुळे ते सदैव आनंदी असतात.आणि इतरांना देखील आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, हे विशेष होय.
सर्वांच्या मदतीला धावून जाणारे, सदा हसतमुख असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची आगळी वेगळी ओळख आहे. श्री.सरोदे यांचे आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे , त्यांना उदंड आयुष्य मिळावे हीच मित्र या नात्याने आमची मनीषा आहे. त्यांच्या भावी जीवनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
- देवेंद्र भुजबळ.9869484800. ---०००---
COMMENTS