मुंबई
: राज्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सुरू न करता केवळ शैक्षणिक वर्ष सुरू केले. मात्र लॉकडाऊननंतर शिक्षकांना मुख्याध्यापकांनी बोलवल्यास आठवड्यातून दोन वेळा शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे. याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाने जारी केला आहे.
राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्याचे नियोजन आणि ऑनलाईन लर्निंग संदर्भात मुख्याध्यापकांना शिक्षकांना आठवड्यातून दोनवेळा शाळेत बोलविता येणार आहे.
त्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्याची तयारी करावी लागणार आहे.महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब ह्रदय विकार आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षकांना शाळेत बोलविण्यात येणार नसून जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत त्यांना वर्क फ्रॉम होम या पद्धतीने कामे देण्यात येणार आहे. शिक्षकांना शाळेत बोलविण्यासंदर्भात मुख्याध्यापकांनी नियोजन करत एकाचवेळी सर्व शिक्षक जमा होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या शाळा कोरोनाच्या विलगीकरण कक्षामध्ये रूपांतर करण्यात आले आहे अशा शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत शिक्षकांना शाळेत बोलाविण्यात येणार नाही. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शिक्षकांना कोणतेही निर्देश देता येणार नाही
कोरोना ड्युटीपासून शिक्षकांची मुक्तता
राज्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाचे सर्वेक्षण आणि इतर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. शिक्षकांना या जबाबदारीमधून मुक्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोरोना ड्युटी असणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑनलाईन शिक्षणासाठी अतिरिक्त शिक्षकांची मदत
विद्यार्थी पट कमी झाल्याने मुख्य शाळेतून अन्य आस्थापनेवर पाठविण्यात आलेल्या अतिरीक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत बोलावून ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी त्यांची मदत घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
COMMENTS