सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील लासिना येथे मागील अनेक दिवसांपासून स्थानिक वाळूमाफियांनी झुंडशाही स्थापन केली आहे.यात सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण करत कायदा व सुव्यवस्थेचे धिंढोरे उडवण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याने येथील चार वाळू तस्करांना १६ मार्चपर्यंत तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.या प्रकरणी तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावल्याने ग्रामीण भागातून प्रशासनातील या धाडसी अधिकाऱ्यांचे स्वागत केले जात आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,लासीना येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाळूतस्कर विकास निवृत्ती परांडे,सदाशिव सोपानराव परांडे,मंगेश बाबासाहेब परांडे,गोविंद बाबासाहेब परांडे यांच्यावर गुन्हा रजिस्टर क्र.४०/२०२१ भा.द.वी.३२३,३२४,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासअधिकारी पोलीस अमलदार कुंडलीक वंजारे यांनी यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन सदर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची शिफारस सोनपेठच्या तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्याकडे केली होती.डॉ.बिरादार यांनी याबाबत अहवाल सादर करत याबाबत तस्करांवर कार्यवाही करण्याची सूचना दिली होती. यात प्रशिक्षणार्थी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी ऐश्वर्या गिरी यांनी या चारही तस्करांबाबत तपासीक कार्यवाही करुन यात तथ्य आढळत असल्याने चारही वाळू तस्करांची १६ मार्चपर्यंत परभणी येथील कारागृहात रवानगी केली आहे.मागील अनेक दिवसांपासून लासीना येथून वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाने या वाळुमाफियांना पकडण्यासाठी विशेष पथक नेमुनही येथील वाळूतस्कर हाती लागत नसल्याने प्रशासन हतबल झाले होते.या कार्यवाहीमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून यापुढे वाळूतस्करांची गय करणार नसल्याचे तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान या निर्णयात पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावत गुन्हेगारांना पाठीशी घालणार नसल्याचे दाखवून दिले आहे.
COMMENTS