घरांच्या प्रश्नावर भीक नको, पण कुत्रा आवरा,असं म्हणावं लागतंय! गोविंदराव मोहिते यांनी व्यक्त केलं परखड मत!*

 

   मुंबई दि.२९: गिरणी कामगार घरांची पात्रता निश्चिती करणासाठी म्हाडाद्वारे मोहीम आयोजित करण्यात आली आहे.परंतु पडताळणी चालू असतानाच,वर्षाला २४० दिवस भरलेले असावेत,ही अट पुढे आणून वयस्कर कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू करण्यात आला आहे, अशी खरमरीत प्रतिक्रीया राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी व्यक्त केली आहे ‌‌.

   वर्षाला २४० दिवस भरलेल्याचा पुरावा सादर करण्यात यावा,असा

म्हाडा द्वारे संदेश सर्व गिरणी कामगारांच्या व्हॉट्सपवर फिरत आहे, त्यामूळे कामगारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे,त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे,आधी असला दाखला अस्तित्वात नाहीये.आज‌ मुंबईत सर्वच गिरण्यां बंद असून असे पुरावे शोधने कठीण आहे.कामगार भविष्य निर्वाह निधीचा सदस्य असेल आणि कामगार राज्य विमा योजनेचा सदस्य असेल तर वर्षाला २४० दिवस भरलेल्याचा दाखला कशाला हवा? असा सवाल करुन गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे,काम केलेल्याचा दाखला,कामगार राज्य विमा योजना, भविष्य निर्वाह निधी हे पात्रतेसाठी पुरावे पुरेसे ठरत असताना ही‌ वर्षाला २४० दिवस भरण्याची अट पुढे आणून ६० ते ७० वर्षावरील वयस्कर कामगारांची सरकारने ‌छळणूक सुरू केली आहे‌.या पूर्वी पनवेलच्या कोन येथील एम.एम.आर.डी.ए. च्या घरांची सोडत काढण्याचे जाहीर केले होते.ते काम‌‌ तेथेच‌ अर्धवट अवस्थेत सोडून हे पात्रता निश्चिती करणाची‌ मोहीम सूरू करण्यात आली आहे.घराच्या पात्रतेसाठी 'कट ऑफ डेट' १९८२ ठरविण्यात आली आहे.असे असताना १९८३ ते २००६ किवा त्या पुढचा दाखला दिला तर,तो अपात्र ठरविण्यात येत आहे,हा शुद्ध म्हाडाचा अडाणीपणा म्हणावा का? या पूर्वी पात्रतेसाठी पाच पुराव्या पैकी एक पुरावा मान्य करण्यात येत होता.आता तर १३ पुरावे देण्याचे जाहीर करण्यात आले आहेत.हे तेरा पुरावे कामगार कुठून आणि कसे देणार?याचा अर्थ ही घरे सरकारला बांधावयाची नाही आहेत काय?

  हे १३ पुरावे‌ कामगार आणि त्यांच्या वारसांना शोधायला लावून अकारण कालापव्यय केला जात असून, कामगारांवर आता भिक्षा नको,पण कुत्रा आवरा,असं म्हणण्याची वेळ आली आहे, असे गोविंदराव मोहिते यांनी शेवटी म्हटले आहे.•••••

टिप्पण्या