जलशक्ती अभियानांतर्गत गावोगावी जल शपथ पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यासाठी ग्रामस्थांचा संकल्प



नांदेड,29- जलशक्ती अभियानांतर्गत गावस्‍तरावर जल शपथ घेण्‍याचे निर्देश राज्‍य शासनाने दिले होते. त्‍यानुसार आज मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मधुन विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व पटवून त्‍यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी सर्व गावातून जल शपथ घेण्‍यात आली. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, स्‍वंयसेवी संस्‍था, ग्रामसेवक, शिक्षक, अधिकारी, कम्रचारी, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती

     जागतिक जलदिनानिमित्त 22 मार्च रोजी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जलसंवर्धनाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देण्यात आले. भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

चौकट- जल जागृतीसाठी जलशक्‍ती अभियानातंर्गत जिल्ह्यात विशेष पंधरवाडा राबवण्यात येणार आहे. ही मोहीम सार्वजनिक चळवळ व्हावी या दृष्टीने ग्रामस्‍थांच्‍या सहभागासह सामाजिक सहभाग, स्‍वंयसेवी संस्‍था तसेच विविध यंत्रणेचा सहभाग घेण्‍यात येणार आहे. पाऊस जेव्हा आणि जिथे पडेल त्यानुसार जलसंचय या संकल्पनेसह या अभियानाची जागृती करुन पाणी संकलनाचे नियोजन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. पावसाच्या पाण्याची योग्य साठवण करण्यासाठी सर्वांना जागृत करणे हा या अभियानाचा हेतू असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.

जल शपथ

मी अशी शपथ घेतो/घेतो की, मी पाण्याचा सुयोग्य वापर करेल व पाणी वाचवा. मी अशी शपथ घेतो/घेते की, मी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा संचय करीन व तल अभियानामध्ये मन:पूर्वक सहभागी होईन. पाणी ही एक अनमोल संपत्ती आहे असे मानून मी पाण्याचा वापर करीन. मी अशी शपथ घेतो/घेते की, मी आपले कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांना देखील पाण्याचा विवेकी वापर करण्यासाठी व ते वाया न घालवण्यासाठी प्रेरित करीन. हा आपला आग्रह आहे व आपणच त्याला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकतो.

टिप्पण्या