गुरु गोबिंदसिंघजींनी समाजातील सर्व जाती धर्माला सोबत घेवून खालसा पंथाची स्थापना केलेली आहे. गुरुग्रंथ साहिबमध्ये प्रत्येक धर्माच्या चांगल्या वाणीचे संकलन करून त्याचा समाविष्ट या ग्रंथामध्ये केलेला आहे. श्री गुरुगोबिंदसिंघजी यांचे आचार, विचार सर्व धर्माला सोबत घेवून अन्यायाविरुद्ध लढण्याचे होते. त्यामुळे ‘गुरुग्रंथ साहिब’ हे एक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले.
ते दि. २९ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील श्री गुरुगोबिंदसिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या वतीने विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित ‘खालसा पंथसृजना: गरज व आवश्यकता आणि इतिहास’ या विषयावरील चर्चासत्राच्या उद्धाघाटनपर आपले मनोगत व्यक्त करत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, तख्त सचखंड साहिब चे मित जथेदार बाबा भाई ज्योतीन्दर सिंघजी, अमृतसर येथील गुरुनानकदेवजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जसपालसिंग संधू, पटियाला पंजाबी विद्यापीठाचे रीलीजन स्टडी सेंटरचे चेअरमन सरदार गुरमीतसिंघ सिद्धू, सल्लागार समितीचे समन्वयक सरदार लड्डूसिंघ महाजन, संकुलाचे संचालक डॉ. दिपक शिंदे यांची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले श्री गुरुगोबिंदसिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्रामार्फत आम्ही पंजाब येथील अमृतसर, पटियाला विद्यापीठाशी सामंजस्य करार करणार आहोत. या केंद्रामध्ये पाच पदविका अभ्यासक्रम, पाच प्रमाणपत्र अभ्यासक्रम आम्ही लवकरच सुरु करणार आहोत. यामधील शिक्षण हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असणार आहे. येथे गुरुमुखी आणि पंजाबी भाषेतील सर्वच साहित्य उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर गुरुमुखी आणि पंजाबी भाषेचे साहित्य मराठी भाषांतर करून उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. या केंद्राची सुरुवात सप्टेंबर-२०२३ पर्यंत करण्यात येईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अमृतसर येथील गुरुनानकदेवजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जसपालसिंग संधू यांनीही आपले विचार यावेळी मांडले, तख्त सचखंड साहिब चे मित जथेदार बाबा भाई ज्योतीन्दर सिंघजी यांनी ‘खालसा पंथ:राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक’ या विषयावर आपले मत मांडले.
सर्वप्रथम श्री गुरुगोबिंदसिंघजी आणि पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस चंदन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. मैफिली गुंडाळे यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. निरंजनकौर यांनी मानले. यावेळी क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. शालिनी कदम, सरदार नेहालसिंघ जहागीरदार, सरदार रणजितसिंघ कामठेकर, सरदार सतपालसिंघ गिल, सरदार डॉ. परविंदरकौर कोल्हापुरे, सरदार रविंद्रसिंघ मोदी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, प्रा. डॉ. कैलाश यादव यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि शहरातील शिख समूहातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा