नांदेड:(दि.१८ ऑक्टोबर २०२२) आजचे युग खऱ्या अर्थाने संशोधनाचे युग आहे; म्हणून प्रत्येक विषयामध्ये संशोधनाला दिवसेंदिवस जास्त महत्...
नांदेड:(दि.१८ ऑक्टोबर २०२२)
आजचे युग खऱ्या अर्थाने संशोधनाचे युग आहे; म्हणून प्रत्येक विषयामध्ये संशोधनाला दिवसेंदिवस जास्त महत्त्व प्राप्त होत आहे . याला अर्थशास्त्र देखील अपवाद नाही;परंतु हे संशोधन होत असताना ते अत्यंत दर्जेदार आणि समाज व अर्थव्यवस्थेला उपयोगी पडेल, असे उपयोजित संशोधन ज्याला आपण अप्लाइड रिसर्च म्हणतो; ते होणे गरजेचे. उपयोजित संशोधन करण्यासाठी आपणाला संख्यात्मक संशोधनाबरोबरच गुणात्मक संशोधन देखील करणे आवश्यक आहे . अर्थशास्त्रामध्ये आत्तापर्यंत जास्तीत जास्त संख्यात्मक चलाचा यांचा उपयोग करून संशोधन झाले आहे. पण वास्तविक पाहता अर्थव्यवस्थेत घटित होणारी प्रत्येक घटना असो किंवा एखादी समस्या असो किंवा एखाद्या समस्येचे निराकरण असो ते जसे संख्यात्मक चलावर आधारित असते त्याचप्रमाणे गुणात्मक चलावर देखील आधारित असते म्हणून संशोधकाने संशोधन करीत असताना संख्यात्मक चला बरोबरच गुणात्मक चलनचा वापर करावा; असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, सामाजिक शास्त्र संकुल, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रमोद लोणारकर यांनी केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त अर्थशास्त्र विभागाद्वारे आयोजित व्याख्यानात " गुणात्मक परिणामाचे मापन" या विषयावरील व्याख्यानामध्ये ते बोलत होते .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले.
विचारमंचावर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अजय मुठ्ठे, डॉ.दिगंबर भोसले, डॉ.ज्ञानेश्वर पुप्पलवाड, डॉ.पाटील, डॉ़.पवार,डॉ.प्रवीण सेलूकर, प्रा.राहुल लिंगमपल्ले,प्रा.आकांक्षा भोरे,प्रा.नयना देशमुख इत्यादी अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक याचबरोबर प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
पुढे बोलताना प्रा. लोणारकर असे म्हणाले, संशोधन करीत असताना संशोधकाने सर्वप्रथम चल, अचल, प्राचल या संकल्पना नीट समजून घेऊन त्यांचे निर्धारण करावे. तसेच अर्थशास्त्रामध्ये घडणारी घटना ज्याप्रमाणे संख्यात्मक चलांवर आधारित असते. अगदी त्याचप्रमाणे गुणात्मक चलांवर देखील आधारित असते. म्हणून अर्थव्यवस्थेत घटणारी कोणतीही घटना असो किंवा समस्या असो अथवा भविष्यातील एखाद्या घटने संदर्भातील अनुमान असो त्या घटनेची संबंधित विसंबित चलावर ज्याप्रमाणे गुणात्मक घटकांचा परिणाम होतो अगदी त्याचप्रमाणे संख्यात्मक चलनाचा देखील परिणाम होत असतो; म्हणून संशोधनाला पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी संशोधकांनी संख्यात्मक आणि गुणात्मक चलांवर आधारित प्रतिमानाची मांडणी करायला हवी तसेच अर्थमितीमधील डमी व्हेरिएबल संकल्पनेचा उपयोग करावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिगंबर भोसले यांनी केले तर आभार प्रा.ज्ञानेश्वर पुप्पलवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. या व्याख्यानास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

COMMENTS